– माधव विद्वांस
शतायुषी क्रिकेट महर्षी देवधर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे पूर्ण नाव दिनकर बळवंत देवधर. 14 जानेवारी 1892 रोजी त्यांचा पुणे येथे जन्म झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले.
शालेय जीवनातच वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी वर्ष 1906 मध्ये कॅम्पमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे कप्तानपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी फर्गसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे पुण्याच्या स. प. महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
भारतात 1850 च्या सुमारास पारशींनी झोरास्ट्रियन क्लब स्थापन करून संघटित क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला होता. त्याकाळी पुणे आणि मुंबईत भारतात नोकरीसाठी अनेक ब्रिटिश अधिकारी आले. त्यांना मुळातच क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी मोठ्या शहरात क्रिकेट क्लब स्थापन केले.
पुण्यात आलेल्या इंग्रजांचा संघ विरुद्ध पार्शी संघ अशी वार्षिक लढत प्रेसिडेन्सी सामने या नावाने खेळले जाऊ लागले. 1895 ते 1906 या काळात ही स्पर्धा चालली. 1907 मध्ये हिंदूंचा संघ या स्पर्धेत सामील झाला आणि ही स्पर्धा तिरंगी झाली.
1912 मध्ये तिरंगी स्पर्धेत मुस्लीम संघ उतरला व स्पर्धा चौरंगी झाली. वर्ष 1909 मध्ये ऍग्रिकल्चरल कॉलेजविरुद्ध देवधरांनी 117 धावा काढत पहिले शतक काढले. 1910 मधील कॉलेजमधील क्रिकेटमधील कामगिरी पाहून हिंदू संघातर्फे त्यांना आमंत्रण आले. या दरम्यान युरोपियन क्लब ही पुण्यातील पहिली क्रिकेटोत्तेजक संस्था होती.
त्यानंतर यंग मेन्स क्रिकेट क्लब (वायएमसीसी) तसेच दी पूना यंग क्रिकेटर्स क्लब (पीवायसी) या संस्था स्थापन झाल्या. देवधर वयाच्या 14 व्या वर्षांपासून पीवायसीकडून खेळले. 1925 मध्ये पीवायसीचे नाव हिंदू जिमखाना असे झाले. 1942 चा अपवाद वगळता 1945 पर्यंत हे सामने चालले. 1946 पासून ही स्पर्धा बंद करण्यात आली.
1911 मध्ये देवधरांना पारशी संघाविरुद्ध पहिला प्रथमश्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी भारताचा पहिला संघ परदेश दौऱ्यावर गेला होता. मात्र 1912 मध्ये बी.ए.च्या अभ्यासामुळे देवधर क्रिकेटपासून दूर राहिले. 1913 मध्ये हिंदू संघाने प्रथमतः युरोपियन संघाला नमविले. या वेळी देवधर या संघात होते.
नंतर 1929 पर्यंत सतत ते तिरंगी सामन्यांमध्ये खेळले. पुण्यात 1926-27 च्या हंगामात प्रवासी एमसीसी संघाविरुद्ध अखिल भारतीय संघाकडून खेळताना देवधरांनी 146 धावा काढल्या होत्या. हा सामना 16 ते 18 डिसेंबर 1926 असा तीन दिवसांचा होता. विजयनगरचे महाराज कुमारनी आमंत्रित केलेल्या हॉब्जसक्लिफ संघाविरुद्ध कोलंबोत झालेल्या तीन कसोट्यांमध्ये भारतीय संघात देवधरांचा समावेश होता.
पहिल्या कसोटीत त्यांनी नाबाद 100 धावा काढल्या होत्या. 1939-40 च्या हंगामापासून महाराष्ट्रातील प्रथमश्रेणी बहरात आली. महाराष्ट्राने सलग नऊ सामन्यांमध्ये विजय मिळविले. त्यांनी प्रथमश्रेणीचे 62 सामने खेळले, 11 वेळा नाबाद, 9 शतके, 44.39 सरासरीने एकूण 3951 धावा त्यांनी केल्या. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री व पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
त्यांचे पुत्र शरद देवधर हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले असून, त्यांच्या नावावर एक शतक आहे. तसेच तारा, सुमन आणि श्यामा या त्यांच्या मुली राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलेल्या आहेत. 24 ऑगस्ट, 1993 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.