पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वरंधा घाट (ता. भोर) रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.8) ते दि.30 मे 2024 पर्यंत वरंधा घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग राजेवाडी ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे सुरू आहे. वरंधा गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू या घाट रस्त्यामधील काही भागांमध्ये काम सुरू करण्याचे बाकी आहे. या घाट रस्त्यावर खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे.
या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही. त्यामुळे दि.30 मे 2024 पर्यंत वरंधा घाट वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याच निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले आहेत.
ताम्हिणी घाटाचा पर्याय
नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाईमार्गे पुणे असा मार्ग वापरावा . तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर असा मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.