लातूर: करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही आजही नागरीक मोठ्या संख्येने रस्तावर येत आहेत. हे असेच चालू राहिले तर लष्कराला पाचारण करावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
करोनाच्या प्रतिबंधासाठी देशात 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच लातूर जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रशासन वेळोवेळी सूचना, आदेश देत आहे.मात्र, या सर्व सूचना नागरिक धाब्यावर ठेऊन आदेश पायदळी तुडवीत आहेत. हे असेच चालू राहिले तर शहरात करोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागेल. लातूरसाठी लष्कर सज्ज असून पाचारण करताच दोन तासांत ते लातूरात पोहचू शकतात.त्यामुळे लातूरकरांना हात जोडून विनंती आहे त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. घरातच थांबावे, असे आवाहन जी. श्रीकांत यांनी केले आहे.