सोलापूर – केंद्रीय संस्था असलेल्या ईडीचा वापर मोदी सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्यामुळे ईडीचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
शरद पवार म्हणाले, माजी मंत्री अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. आता रोहित पवारांना सुद्धा ईडीची नोटीस दिली आहे. एकूणच सरकार ईडीचा वापर हत्यार म्हणून करत असून विरोधकांना ईडीची भीती दाखवली जात असल्याची टीकाही त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोलापुरातील असंघटित कामगारांच्या रे नगर मधील १५ हजार घरांचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र या गृहप्रकल्पाचे सर्व श्रेय हे माजी आमदार नरसय्या आडम यांना जाते. मोदींनी त्याचे श्रेय घेऊ नये, अशी कोपरखळीसुद्धा त्यांनी यावेळी मारली.
नरेंद्र मोदींना व्यासपीठावर अश्रू अनावर झाले. तसेच त्यांनी लहानपणीच्या आठवणींना दिलेला उजाळा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात आजही अनेक लोक बेरोजगार आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. या विषयावर मात्र पंतप्रधान मोदी काहीच बोलले नाहीत, अशी टीकाही शरद पवारांनी केली.
मराठा आरक्षणावर शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अनेक दिवस उपोषणाला बसले होते. तेव्हा आश्वासन देऊन जे दोन मंत्री उपोषण सोडविण्यासाठी आले होते. आज ते मंत्री तोंड दाखवत नाहीत.
सरकार मराठा आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. ज्या दोन मंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असावी, असे स्पष्ट दिसत असल्याचेही शरद पवारांनी सांगितले.