नांदूर परिसरातील शेतकऱ्यांची लाल कांद्याला पसंती
नांदूर- परतीच्या पावसामुळे जमिनीतच सडलेली कांद्याची रोपे, वाढत्या बाजारभावामुळे रोपांना आलेला सोन्याचा भाव, बाजारात लागवडीसाठी रोपांची वाढती टंचाई यामुळे शेतकऱ्यांनी आता यावर उपाय शोधत पेरणी यंत्राच्या साहाय्याने कांदा लागवड न करता थेट कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे.
कमी वेळात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत असली तरी शेतकऱ्यांनी सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी झाला तर हजारो रुपयांची खर्चाची बचत होणार आहे. सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च टाळून थेट कांदा लागवड होत असल्याने तालुक्यातील शेतकरी यंत्राच्या साहाय्याने कांदा बियाणे पेरणीचा प्रयोग करीत आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कांदा रोपे वाया गेली, तर कांदा अतिपाण्यामुळे सडला. परिणामी हातात येणारे पिक वाया गेले. पुन्हा नव्याने कांदा रोप तयार करावयाचे झाल्यास त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर कांदा लागवड होईल. हा कांदा ऐन उन्हाळ्यात काढणीस येईल. त्यातही त्यावेळच्या कडक उन्हामुळे कांदा येतो की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नसल्याने बियाणांच्या लागवडीनंतरही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचेच वातावरण आहे.