रायबरेली – उत्तरप्रदेशात आपला पक्ष सत्तेत आल्यास गरिबांना पाच वर्षांसाठी मोफत रेशनसह एक किलो तूप देण्याचे आश्वासन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अर्खिलेश यांनी दिले आहे. येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी भाजप सरकार राज्यातील रेशनची योजनाच रद्द करण्याच्या बेतात आहे असा आरोप केला.
सध्या उत्तरप्रदेशात गरिबांना जे रेशन मिळत आहे, ते त्यांना निवडणुकीपर्यंत ते मिळेल. निवडणुकीनंतर मात्र ते मिळणार नाही. गरीबांचे रेशन नोव्हेंबर मध्येच बंद केले जाणार होंते पण निवडणुका असल्याने भाजपने त्याची मुदत मार्च पर्यंत वाढवली. त्यामुळे मार्चनंतर हे रेशन गरीबांना मिळणार नाही. पण आमचे सरकार सत्तेवर आल्यावर मात्र आम्ही पाचही वर्ष मोफत रेशन देऊ असे ते म्हणाले. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात मोफत रेशन साठी निधीची तरतूदच केलेली नाही. कारण मार्चमध्ये निवडणुका संपणार असल्याने त्याची गरज नाही असा विचार भाजपने केला आहे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, आम्ही पुर्वीही राज्यातील जनतेला रेशन देत होतो. आता मोहरीचे तेल आणि एक किलो मोफत तुपही गरीब परिवारांना मोफत दिले जाईल असे आश्वासनही अखिलेश यांनी दिले आहे. भाजपतर्फे सध्या येथे जे मोफत अन्नधान्य दिले जात आहे त्याचा दर्जा अत्यंत सुमार आहे, मीठातून काचेचे तुकडे येथे निघत आहेत असे ते म्हणाले. राज्यात सरकारी क्षेत्रात 11 लाख पदे रिक्त असून या जागांवर आमचे सरकार त्वरीत भरती प्रक्रिया सुरू करून युवकांच्या रोजगाराची सोय करेल असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय नेते उत्तरप्रदेशात घरोघरी जाऊन प्रचार करीत होते.पण त्यांच्या भेटीच्यावेळी येथील लोकांनी त्यांना रिकामे गॅस सिलिंडर दाखवयाला सुरवात केली तेव्हापासून भाजप नेत्यांची ही घरोघरी जाण्याची मोहीम थंडावली आहे असेही अखिलेश यांनी यावेळी नमूद केले.