IPL 2024, Live Cricket Score, KKR vs RCB : आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमने-सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात चुरशीची लढत पहायला मिळाली.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने पाचवा विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने थरारक अशा सामन्यात आरसीबीचा एका धावेने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या, पण संघाला एकच धाव करता आली आणि पराभवाला सामोरे जावे लागले.प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआर संघाने 6 विकेट गमावत 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी संघ सर्वबाद केवळ 221 धावा करू शकला.
Don’t know what to say. We won. 😁 pic.twitter.com/PtbwqwqMdf
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 21, 2024
विजयासाठी 223 धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही कारण विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस चौथ्या षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. एकीकडे विराटने 18 धावा केल्या तर डु प्लेसिसने केवळ 7 धावा केल्या. दरम्यान, तिसऱ्या विकेटसाठी विल जॅक आणि रजत पाटीदार यांच्यातील 102 धावांच्या धडाकेबाज भागीदारीने आरसीबीला सामन्यात परत आणले होते. बेंगळुरूसाठी विल जॅकने 32 चेंडूत 55 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय पाटीदारने शानदार फलंदाजी करत 23 चेंडूत 52 धावांची खेळी केली. दरम्यान, सुनील नरेनने 13व्या षटकात 2 बळी घेत सामन्याचे चित्रच पलटून टाकले होते.
एकवेळ 11 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 2 बाद 137 धावा होती. पण पुढच्या 2 षटकांत बेंगळुरूने 4 महत्त्वाच्या विकेट गमावल्या, त्यामुळे सामना पूर्णपणे फसला होता. 13व्या षटकानंतर संघ 6 विकेट गमावून 155 धावांवर खेळत होता. अशा परिस्थितीत प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला सुयश प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिक यांनी जबाबदारी स्वीकारली. डावाचा दुसरा टाईम-आऊट 16व्या षटकानंतर झाला, तोपर्यंत आरसीबीची धावसंख्या 6 गडी बाद 181 धावा होती. त्यांना 24 चेंडूत विजयासाठी 42 धावांची गरज होती.
शेवटच्या 2 षटकात आरसीबीला विजयासाठी 31 धावांची गरज होती, परंतु 19व्या षटकात कार्तिक बाद झाल्यामुळे बेंगळुरूच्या विजयाची शक्यता जवळपास संपुष्टात आली होती. जेव्हा शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. कर्ण शर्माने मिचेल स्टार्कच्या षटकात 3 षटकार मारून सामना रोमांचक बनवला होता, मात्र 5व्या चेंडूवर मिचेल स्टार्कने कर्ण शर्माला झेलबाद करून सामना कोलकाताच्या बाजूने परत आणला. शेवटच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसन धावबाद झाला, त्यामुळे आरसीबीला एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला.
केकेआरची गोलंदाजी….
आरसीबीला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असल्याने संघ सुरुवातीपासून 10 पेक्षा जास्त धावगतीने खेळत होता. अशा स्थितीत केकेआरच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनी चांगली गोलंदाजी केली. रसेलने 3, तर नरेनने 2 बळी घेतले. नरेननेच 13व्या षटकात 2 बळी घेत केकेआरला सामन्यात परत आणले. सुमारे 25 कोटी रुपयेला खरेदी केलेला गोलंदाज मिचेल स्टार्क या सामन्यातही अपेक्षित गोलंदाजी करू शकला नाही, त्याने 3 षटकात 55 धावा दिल्या होत्या परंतु त्याने शेवटच्या षटकात कर्ण शर्माचा झेल घेत कोलकात्याला पराभवापासून वाचवले.त्यांच्याशिवाय हर्षित राणाने 2 आणि वरुण चक्रवर्तीने 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 6 बाद 222 धावा केल्या. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी 4.2 षटकात 56 धावा जोडल्या. 14 चेंडूत 48 धावांची तुफानी इनिंग खेळून फिल सॉल्ट मोहम्मद सिराजचा बळी ठरला. यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. 15 चेंडूत 10 धावा करून सुनील नरेनला यश दयालने बाद केले. अंगकृश रघुवंशी 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. व्यंकटेश अय्यरने 8 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. काही वेळातच केकेआरचे 4 फलंदाज 97 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंगने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण रिंकू सिंग 16 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्सला 137 धावांवर पाचवा धक्का बसला. श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली असली तरी दुसरीकडे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. श्रेयस अय्यरने 36 चेंडूत 50 धावा केल्या आणि कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये रमणदीप सिंग आणि आंद्रे रसेल यांनी स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या 16 चेंडूत 43 धावा जोडल्या. रमणदीप सिंगने 9 चेंडूत 24 धावा केल्या. तर आंद्रे रसेल 20 चेंडूत 27 धावा करून नाबाद परतला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. याशिवाय मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.