शेवगाव -तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. यावेळी झालेल्या प्रचंड वादळवाऱ्याने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. विद्युत पोल आडवे झाले. घरांची पडझड झाली तर गारपिटीने शेतातील गहू, कांदा, हरभरा, मका, फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कांदा पिकाला पात राहिली नाही. सोंगून शेतात पडलेला गहू, कांदा या पिकांना शेतात पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसला. या भागात काही तासातच होत्याचे नव्हते झाले. आमदार मोनिका राजळे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांसह कुटुंबीयांना धीर दिला.
आमदार राजळे सकाळी साडेआठ पासून ढोरजळगावने पासून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.कृषिमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन जास्तीत-जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असा दिलासा दिला.
आमदार राजळे यांनी आज ढोरजळगावने, भातकुडगाव, भायगाव, देवटाकळी, बक्तरपूर, ढोरसडे, आंत्रे, शहरटाकळी, खामगाव, हिंगणगाव असा दिवसभर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. ढोरजळगावने पासून आमदार राजळे यांनी पाहणी सुरू केली. भातकुडगावला नजन वस्ती व टोंगे वस्तीवरील गहू, कांदा पिकाचे नुकसान झालेले पाहून परशुराम फटांगरे यांच्या घराची झालेली पडझडही त्यांनी पाहिली.
शहर टाकळी येथील मोहिनीराज दीक्षित यांच्या घराची झालेली पडझड व त्यांच्या पिकाचे झालेले नुकसान तसेच नागेश गिरम यांच्या पाच एकर भुइसपाट झालेल्या गव्हाची पाहणी केली. देवटाकळीच्या तागड वस्तीवरील कांदा पिकाचे तसेच सुरेश, राजेंद्र व भानुदास क्षीसागर यांच्या घरांचे पत्रे उडून गेले, त्याचीही पाहणी केली.