Maharashtra Unseasonal Rain Alert – राज्यात आठवड्याभरापासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरू आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले असताना हवामान खात्याने अवकाळीचा मुक्काम पुन्हा वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. दरम्यान आज शुक्रवारी पूर्व विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Unseasonal rain crisis in Maharashtra till April 15)
अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढला –
देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या कुठे उन्हाचा चटका, तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थती आहे. अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच रविवारपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये, तर रविवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
शेती पिकांना मोठा फटका –
दरम्यान, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी आंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात झाडावरील आंबे वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे खाली पडले आहेत. तर दुसरीकडे लिंबू आणि भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.