पुणे – भारत लवकरच “हिमाद्री’ या आपल्या आर्क्टिक स्थानकाचे कामकाज पूर्णत्वाने सुरू करणार असल्याची माहितीही केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी पुण्यात दिली. तसेच त्यांनी विविध प्रकल्पांची माहितीही दिली. केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला (आयआयटीएम) भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालया (एमओईएस) अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या या संस्थेच्या सर्व प्रयोगशाळांमध्ये फिरून संस्थेत सुरू असलेल्या सर्व संशोधन प्रकल्पांची तपशीलवार माहिती घेतली. प्रत्युष सुपर कॉम्प्युटरचे कामकाज, क्लाउड स्टिम्युलेशन, लाइटनिंग फिनोमिनोन (विजांसंबंधी होणाऱ्या घडामोडी) आणि संस्थेमध्ये चालणारे इतर अभ्यासक्रम त्यांनी पाहिले.
“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’, ही संस्था लक्षद्वीप येथे डिसॅलिनेशन प्लान्ट विकसित करत आहे. चेन्नईतील “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’ (एनआयओटी)तर्फे खोल पाण्यात चालणारे सबमर्सिबल विकसित केले जात आहे.
यावेळी केंद्रीय भूविज्ञान मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्याची “आयआयटीएम’ संस्था, आसाममधील तेजपूर विद्यापीठ आणि नैनिताल येथील “एआरआयईएस’ संस्था यांच्यात दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणेचे संचालक आणि तेजपूर, आसाम येथील तेजपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार, यांच्यातील हा सामंजस्य करार, आसाम येथील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात निरीक्षण केले जाणारे हरितगृह वायू आणि ऊर्जा प्रवाहांच्या बायोस्फियर-वातावरणाच्या देवाणघेवाणीवरील सहयोगी संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.