नवी दिल्ली – समान नागरी कायदा हा भाजपचा नेहमीचा इलेक्शन फंडा आहे. त्यांनी उत्तराखंड मध्ये निवडणुकीच्यावेळी समान नागरी कायद्यासाठी समिती नेमली होती. तेथे निवडणुका झाल्यानंतर ही समिती गुंडाळली गेली आणि तिचे सदस्य घरी गेले. आता गुजरातमध्येही त्यांनी अशीच समिती नेमण्याची घोषणा केली आहे. पण त्या समितीची स्थितीही उत्तराखंड सारखीच होईल, आणि निवडणुकीनंतर ही समिती पण घरी जाईल.
कारण भाजपची नियत साफ नाही असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अशीच समिती ते मध्यप्रदेशात का नाही बनवत, उत्तरप्रदेशात का नाही बनवत असा सवाल उपस्थित करीत केजरीवालांनी म्हटले आहे की, त्यांना संपूर्ण देशातच समान नागरी कायदा बनवायला पाहिजे असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला या विषयावर केवळ राजकारण करून मते मिळवायची आहेत त्यांना हा कायदा लागू करण्यात स्वारस्य नाही असेही केजरीवालांनी नमूद केले. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात मंत्रिमंडळाची अखेरची बैठक काल झाली. त्यात समान नागरी कायद्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची केजरीवालांनी खिल्ली उडवली आहे.