थिरूवनंतपूरम – मोदी सरकारने 2016 मध्ये केलेल्या नोटबंदीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले. चुकीच्या विचारातून घेण्यात आलेल्या त्या निर्णयामुळे देशातील बेरोजगारी शिगेला पोहचली आहे. त्याशिवाय, असंघटित क्षेत्राची स्थिती बिकट बनली आहे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.
राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या संस्थेने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल विकास परिषदेचे उद्घाटन मनमोहन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकार राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करत नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. केरळच्या विकासासाठी एक दशकाच्या कालावधीचा विचार करून कृती आराखडा बनवण्याच्या उद्देशातून प्रतीक्षा 2030 या नावाने संबंधित परिषद आयोजित करण्यात आली. त्या परिषदेत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेशही वाचून दाखवण्यात आला.
केरळमधील सामाजिक सौहार्द दबावाखाली आले आहे. केरळी जनतेमधील बंधूभाव मजबूत करण्यासाठी आणि त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी नवी रणनीती अवलंबण्याची गरज सोनियांनी अधोरेखित केली. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेसची विचारसरणी मानणाऱ्या आणि आर्थिक थिंक-टॅंक मानल्या जाणाऱ्या संस्थेने संबंधित परिषदेचे आयोजन केले.