रेडा -वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतातील उभी पिके करपून चालली आहेत. महाआघाडी सरकारचे वीज खंडित करण्याचे धोरण शेतकरीविरोधी आहे. सध्या शेतकरी वर्ग अडचणीत असल्याने महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कृषीपंपाच्या वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफीचे आश्वासन दिलेले तीन पक्ष सध्या सत्तेवर आहेत. करोनामुळे अनेक महिने बाजारपेठा ठप्प असलेले शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाच महावितरणने दि.1 फेब्रुवारीपासून कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी असूनही शेतातील उभी पिके पिके करपून जाण्यास सुरुवात झाली आहे. ऊस व इतर पिकांच्या लागणी खोळंबल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने या नुकसानीस महाआघाडी सरकार जबाबदार आहे.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाया गेली. त्यानंतर कर्ज काढून भांडवल उभे करून शेतकऱ्यांनी घेतलेली पिके शेतात उभी आहेत.परिणामी, शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे. शिवाय करोनामुळे वीज बील थकबाकी भरण्याची कुवत शेतकऱ्यांमध्ये नसल्याने शासनाने संपूर्ण वीज बिल माफ करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
करोनाच्या काळात 100 युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, हे आश्वासन न पाळता वीज बिल सक्तीने वसूल करण्याची व वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम जनतेवर अन्यायकारक आहे. जर शासनाने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवली नाही तर भाजपच्या वतीने राज्यभर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.