ठाणे – ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाची शाखा पाडण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करून सरकारला धमकी दिली आहे, पण त्यांची ही धमकी पोकळ आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
येथे एका दिवाळी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, ठाकरे यांनी शनिवारी मुंब्रा येथील शाखास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना माघारी फिरावे लागले.
ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे दिवाळीच्या उत्सवात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाकरे यांच्या दौऱ्यात मुंब्य्रातील जनतेने आपली ताकद दाखवून दिली.
लोकशक्तीसमोर काहीही चालत नाही, असे ते म्हणाले मुंब्य्रातील शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन इतके शक्तिशाली होते की ठाकरे गटाच्या नेत्यांना तेथून घाईघाईने माघार घ्यावी लागली, असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सातव्या क्रमांकावर फेकली गेली आणि पुढच्या निवडणुकीत ते दहाव्या क्रमांकावर फेकले जातील आणि जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा दावाही त्यांनी केला.