मुंबई: महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू आहे. तीनही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्रामवर मंथन करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झाल्याची चर्चा असून महाराष्ट्र सरकारने बुलेट ट्रेनसाठी दिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये वापरली जाऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये या मुद्द्यावर तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार पैसे देणार असल्याची माहिती आहे. या निधीमध्ये महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा आहे. त्यामुळे हा हिस्सा थांबवण्यात येणार असल्याचा महाशिवआघाडीचा मास्टर प्लॅन आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक मानला जातो. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई अशी धावेल. जपानच्या मदतीने ही ट्रेन तयार केली जात आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या प्रकल्पाचा पाया घातला होता. मात्र शिवसेना व विरोधी पक्ष या प्रकल्पाविरोधात होती.
दिल्लीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात सातत्याने बैठक होत असून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे बैठक घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवसेनेशी अंतिम चर्चा होईल. शुक्रवारी महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन केले जाईल असा दावाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.