Uddhav Thackeray VS Ashok Chavan – उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये गेलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधण्यासाठी आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचा विषय पुन्हा उपस्थित केला आहे.
भाजपने चव्हाणांना राज्यसभेवर पाठवल्यास तो शहीद जवानांचा अनादर होईल, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. अशोक चव्हाण यांनी ते मुख्यमंत्री असताना कारगील शहीदांसाठीच्या आदर्श गृहनिर्माण प्रकल्पात घोटाळा करून शहीदांचा अवमान केल्याची टीका त्यावेळी भाजपकडून केली जात होती. त्यावरून त्यांनी हा पलटवार केला आहे. । Uddhav Thackeray VS Ashok Chavan
सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील सभेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी नांदेड येथे जाऊन अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
अशोक चव्हाणांनी कारगील शहीदांचा अवमान केल्याचा आरोप त्यावेळी या नेत्यांनी केला होता. पण जर आता पंतप्रधानांनी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले तर ते आमच्या शहीद सैनिकांचा अनादर करण्यासारखे होईल,असे ते म्हणाले.
पंतप्रधान आणि फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना ते लिडर नव्हे तर डिलर आहेत असे संबोधले होते याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले की मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की ज्या व्यक्तीने शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा अनादर केला आहे अशा व्यक्तीला ते राज्यसभेवर पाठवणार आहेत का?
आदर्श गृहनिर्माण सोसायटीची ही दक्षिण मुंबईतील ३१ मजली भव्य इमारत संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या जमिनीवर आवश्यक परवानग्या आणि मंजुरी न घेता बांधण्यात आली होती असा आरोप त्यावेळी झाला होता व त्यावेळी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे.