Uddhav thackeray and Bjp : भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रमुख नेते आता उद्धव ठाकरे यांच्यावर जाळे फेकण्याचे काम करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आपण परत एकदा एकत्र येऊन बसू, आमच्या चुका झाल्या, परत बसू असा ते प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही त्या संदर्भात प्रतिक्रीया देत नाही. सध्या आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतोय. आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहणार आहोत. जरा आम्ही सातत्याने नितेश कुमार यांच्याप्रमाणे पलटी मारली, तर आमच्यावर कोण विश्वास ठेवेल? लोकांचा विश्वास जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे घेतलेला विचार अर्धवट सोडून जाणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपसोबत २५ वर्षे आम्ही होतो. त्यांनीच आमचा पक्ष फोडला. आमच्या लोकांना नादाला लावले, पण नादाला लावलेले लोक फार काळ टिकत नसतात. ते या तमाशातून त्या तमाशा जातात. मात्र आम्हाला त्यांच्याकडे जायची गरज नसल्याचे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे वेगवेगळे नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे लोक भावनेचा आदर करणारे आहे. राज्याची लोक भावना शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आमच्यावर ज्यांनी ही वेळ आणली त्यांच्या सोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
ठाण्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक घ्या
महाराष्ट्रातमध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो प्रयोग केला तो, अयशस्वी झाला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना दिली. मात्र त्यांच्याकडे अर्धा टक्केही मतदान नाही.त्याचप्रमाणे अजित पवार यांच्याकडे देखील एक टक्का देखील मतदान नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला घालण्याचे काम त्यांनी केले आहे. मात्र हिम्मत असेल तर ठाण्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक घ्या, असे आव्हान देखील त्यांनी सत्ताधारी पक्षाला केले आहे.