सोलापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी तत्काळ पुढाकार घेतला. ती तत्परता ते राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतीत घेऊ शकत नाहीत. कारण त्यांना मित्र पक्षांची नाराजी नको आहे. आणि यातून आपली खुर्ची जाईल याची भीती असून सत्तेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबल झाले आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
देशद्रोही असणाऱ्या व्यक्तींसोबत अल्पसंख्यांक मंत्री मंत्री नवाब मलिक यांचा संबंध आहे. या आरोपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना अटक केली आहे, तर भाजपच्या आदेशानुसार त्यांना अटक केलेली नाही. मात्र नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी महाविकासआघाडी केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापुरात मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना केली.
नवाब मलिक यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध आहेत, असा आरोप या तपास यंत्रणेने लावला आहे. एका देशद्रोही सोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध ठेवणे हा देशद्रोह आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक हटाव देश बचाव अशी भूमिका घेत राज्यभर नारा लावला आहे. राज्य सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेणे गरजेचे असताना महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र भाजपा गप्प बसणार नाही. राजीनामा घेणारच आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी बोलताना केली.
357 निष्पापांचा बळी घेणारा व बॉम्बस्फोट घडविणाऱ्या आरोपीशी व्यवहार करणे म्हणजे मोठा देशद्रोह असून मालिकांनी तो देशद्रोह केला आहे. हे सरकार त्याला मुस्लिम रंग देण्याचाही प्रयत्न करीत आहे. शेतकरी कामगार ,आणि बेरोजगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायला वेळ नसलेल्या ठाकरे सरकारला देशद्रोही मालिकांच्या समर्थनार्थ आंदोलनास मात्र वेळ आहे. एसटी कर्मचारी संप इतके महिने सुरू असतानाही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दरेकर म्हणाले.
मलिक सध्या जेलमध्ये असल्यामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला कसे हजर राहणार. अगोदरच मातोश्रीवर एक स्क्रीन लावला आहे. आता दुसरा स्क्रीन मलिक यांच्यासाठी जेलमध्ये लावावे लागेल, असेही दरेकर म्हणाले.
दरम्यान छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असल्याबाबत ते म्हणाले, राज्यपालांची तसे वक्तव्य केले नव्हते. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत दरेकर यांनी त्यांचे समर्थन केले.