फलटण – मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका दोन्ही खासदारांनी मांडली.
दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा व धनगर आरक्षणाच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार झालेल्या भेटीत खासदार उदयनराजे आणि खासदार रणजितसिंह यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाच्या परिस्थितीवर चर्चा केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे.
सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाणारा मराठा समाज आहे. आता समाजातील मुलामुलींची आणि कुटुंबांची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. मुलामुलींची शैक्षणिक फी भरणे आवघड आहे. पालकांना जमिनी विकून आणि बँका, खाजगी सावकारांकडून कर्जे घ्यावी लागत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे मराठा समाजातील कुटुंबांची परिस्थिती वाईट झाली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.
अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे; परंतु महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात ‘धनगड’ शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. या विषयामध्ये आपण लक्ष घालून, धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंतीही दोन्ही खासदारांनी केली. या दोन्ही विषयांवर सकारात्मक विचार करून, लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.