दुबई – करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी भारतासह अन्य 13 देशांच्या विमान प्रवासावर घातलेली बंदी संयुक्त अरब अमिरातीने कायम ठेवली आहे. या बंदीमधून व्यावसायिक विमाने, मालवाहू विमाने आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासांना वगळण्यात आले आहे.
भारत, पाकिस्तान, लायबेरिया, नामिबिया, सिएरा लिओन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा, झांबिया, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील विमान प्रवासाला बंदी असल्याचे “यूएई’च्या विमान वाहतूक प्राधिकरणाने म्हटले आहे.
भारतात करोना साथीची दुसरी लाट ऐन भरात आली असताना “यूएई’मधील राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने 24 एप्रिलपासून भारतातील सर्व विमानसेवा थांबवली आहे.
“यूएई’मध्ये 7 अमिरातींचा समावेश होतो. करोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून हे सर्वजण आपापली प्रवासाची धोरणे स्वतःच निश्चित करत आहेत. दुबई जुलै महिन्यापासून विदेशी नागरिकांसाठी आपल्या सीमा खुल्या करत आहे, तर आबुधाबीमध्ये विदेशातून आलेल्यांना क्वॉरंटाइन केले जाते आहे.
नव्या नियमांनुसार भारतात राहणाऱ्या “यूएई’च्या नागरिकांसाठी परतीच्या प्रवासाची परवानगी मिळू शकणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियात असलेल्या “यूएई’च्या नागरिकांनाही जर पूर्ण लसीकरण झाले असेल तरच मायदेशी परतण्याची परवानगी असणार आहे.