नागपूर – आणीबाणीच्या काळात मिसा खाली अटकेत असलेल्या लोकांना निवृत्तिवेतन चालू करा, अशी मागणी करीत संघ कार्यकर्ते असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याने सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
आमच्या मागणीबाबत 15 ऑक्टोबरपर्यंत निर्णय झाला नाही, तर आम्ही हेडगेवार स्मृती मंदिरापुढे आत्मदहन करू, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. अवधूत जोशी आणि स्मृती जोशी असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याने आज स्मृती मंदिरात जाऊन तेथे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना तेथून हटवले आणि त्यांना नंतर सोडून दिले.
अवधूत जोशी (वय 66) हे भिलाईचे रहिवासी आहेत. आणीबाणीत त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पंधरा महिन्यांसाठी तुरुंगात ठेवण्यात आले होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघ स्वयंसेवकांना आणीबाणीच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार जोशी यांनी या आंदोलनात भाग घेतला आणि त्यांना त्यात अटक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वता संघस्वयंसेवक आहेत, त्यांनी आणीबाणीच्या काळात संघ स्वयंसेवकांनी जो त्याग केला तो त्यांनी विसरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मिसा कायद्याखाली जे त्यावेळी कारागृहात होते त्या सर्वांनाच पेन्शन लागू केली पाहिजे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामार्फत आम्ही पंतप्रधानांना ही विनंती करू इच्छितो, असे जोशी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. आमच्या या मागणीला अण्णा हजारे आणि संभाजी भिडे यांनीही पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आमची ही मागणी मान्य झाली नाही तर आम्ही 15 ऑक्टोबर रोजी नागपुरात हेडगेवार स्मृती मंदिरापुढे येऊन आत्मदहन करू असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या संबंधात नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी सांगितले की, संघापुढे अशी पेन्शनची संकल्पना यापूर्वी कधीही नव्हती.
यावर जर कोणी निर्णय करायचा असेल तर तो सरकारने करावा, संघाचा या मागणीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी संघाकडे ही मागणी न करता सरकारकडे ही मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.