नवी दिल्ली – मागील ६ दिवसांत इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीतील ९५ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्या आघाडीच्या दोन-तृतीयांश सदस्यांवर आतापर्यंत निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या लोकसभेत इंडियाचे एकूण १३८ खासदार आहेत. त्यातील ४३ जणच आता हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सभागृहात उपस्थित राहू शकतील. त्यामध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह त्या पक्षाच्या ९ खासदारांचा समावेश आहे.
द्रमुकच्या २४ पैकी १६, तर तृणमूल कॉंग्रेसच्या २२ पैकी १३ खासदारांचे निलंबन झाले आहे. समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि माकप या पक्षांचे लोकसभेत प्रत्येकी ३ खासदार आहेत. त्या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी २ खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
आपचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांचाही निलंबितांमध्ये समावेश आहे. निलंबितांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ६ पैकी एकाही खासदाराचा समावेश नाही. संसद अधिवेशन २२ डिसेंबरला समाप्त होणार आहे.