वाई – जावळी आणि वाई तालुक्यात जुगार, मटका व चोरटी दारू विक्री करणाऱ्या दीपक शामराव वारागडे (वय 48) आणि त्याचा साथीदार महेश रामचंद्र जाधव (वय 39, दोघे रा. कुडाळ, ता. जावळी) यांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख बजावला आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी चौकशी केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई व जावळी तालुक्यात जुगार, मटका, चोरटी दारू विक्रीचे गुन्हे वारागडे आणि जाधव सातत्याने करत होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अनेकदा अटकही झाली होती. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या.
त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत होते. याबाबत सपोनि रमेश गर्जे यांनी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्याची चौकशी वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दोघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.