पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि.23) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान टळत आहे. बारावी फेरपरीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट 2019 रोजी घेण्यात आली होती. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. ज्या विद्यार्थ्यांना गुणाची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी दि. 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत. तसेच, ज्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत (झेरॉक्स) प्राप्त करावयाची आहे, त्यांनी दि. 26 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान संबंधित मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिले आहेत.