जनतेच्या आशीर्वादाने हॅट्ट्रिक साधणार
पुसेगाव – विधानसभा निवडणूक सातारा-जावळी मतदारसंघातून नव्हे तर कोरेगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे. गेल्या दहा वर्षांत कोरेगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात कोट्यवधींची विकासकामे केल्याने या मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने विक्रमी मताधिक्याने हॅट्ट्रिक साधणार आहे, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
जांब, ता. खटाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगौड, सदस्य प्रदीप विधाते, पंचायत समितीचे उपसभापती संतोष साळुंखे, सागर साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, दगडू शिंदे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कचरे, जितेंद्र शिंदे, जालिंदर बिटले, प्रमोद गायकवाड, हणमंत मोरे, सोमनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिंदे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेसाठी आघाडी शासनाच्या कालावधीत निधी आणून बॅरेज, वीजपंप, पाईपलाइन, बोगद्याच्या कामांना गती देण्याचे काम प्रामाणिकपणे केले. पुसेगावच्या औद्योगिकीकरणासाठी कण्हेर धरणातून पाणी आरक्षित केले. या प्रकल्पासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तरी ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही नेतेमंडळींना कोरेगाव मतदारसंघाचा आमदार होण्याची स्वप्ने पडत आहेत. जिहे-कठापूर योजनेसाठी 800 कोटी आणल्याचे फ्लेक्सबोर्ड खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात लागले असून ऑगस्टअखेरीस हे पाणी नेर तलावात आणणार असल्याची दवंडी ते पिटत होते. मात्र, महिना संपत आला तरी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
जिहे-कठापूरच्या आज सुरू असलेल्या कामांसाठी मागच्या सरकारने निधी मंजूर केला होता. गेली पाच वर्षे केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांच्या नेत्यांनी कोरेगाव मतदारसंघात किती निधी आणला, याचा लेखाजोखा मांडावा. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण घातक आहे. मी राजकारणात तत्त्व व निष्ठा जपणारा कार्यकर्ता आहे. मी सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतो. केंद्र व राज्यातील सरकारकडे एवढे मोठे बहुमत असूनही सामान्य शेतकरी, सुशिक्षित युवक किती सुरक्षित आहे? हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे.
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकरी मोर्चा या सर्वांना पोकळ आश्वासने दिली. आता या सरकारला योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मधुकर ढाणे यांनी आभार मानले. बिटलेवाडी, जांब, रामोशीवाडी, आमलेवाडी, गादेवाडी, जाखणगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.