विलास पंढरी
पद्मविभूषण पुरस्कार विजेते पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे वयाच्या 94व्या वर्षी नुकतेच निधन झाले. संपूर्ण हयात पर्यावरण विषयक आंदोलने उभी करण्यात आणि ती यशस्वी करण्यात त्यांनी आयुष्य वेचले.
सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म 9 जानेवारी, 1927 रोजी सध्याच्या उत्तराखंडमधील टेहरीजवळील मरोडा गावात झाला. बालपणापासूनच आंदोलक प्रवृत्तीचे असलेल्या बहुगुणा यांनी 13 व्या वर्षी सामाजिक कार्य सुरू केले होते.
त्यांनी श्री देव सुमन यांच्या नेतृत्वाखाली अहिंसावादी आंदोलनात पहिल्यांदा भाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घेत लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. सच्चे गांधीवादी असलेल्या बहुगुणांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गांधी मार्गानेच पुढे जात 1965 ते 1970 या काळात डोंगराळ भागातील महिलांना दारूबंदीसाठी एकत्र आणले.
डॉ. प्रकाश आमटे यांनी जशी नक्षलग्रस्त हेमलकसा येथे लग्नानंतर राहावे लागेल, अशी पत्नीला अट घातली होती तशीच अट गांधीवादी सुंदरलाल यांनी पत्नीला घातली होती.
टेहरीतील ग्रामीण भागात आश्रमात राहावे लागेल ही ती अट होती आणि पत्नीनेही त्यांना यामध्ये साथ दिली. बहुगुणा यांनी हिमालयातील निसर्ग आणि तेथील संस्कृती जपण्यासाठी सुमारे 4 हजार 700 किलोमीटरची दुर्गम भागात पदयात्रा केली. हिमालयातील वृक्ष तोड वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या “चिपको आंदोलन’ सुरू केले.
चिपको आंदोलनाची मूळ कल्पना त्यांच्या पत्नीची होती, असे म्हणतात. चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी अनोखे आंदोलन होते. एप्रिल 1973 मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात “चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला मिठी मारून कवटाळून ठेवले.
या आंदोलनामुळे शेकडो झाडांची होऊ घातलेली कत्तल, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली. जेव्हा जेव्हा ठेकेदार झाडे कापायला आपली माणसे घेऊन येत असत तेव्हा तेव्हा तेथील महिला झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि “पेड कटने नही देंगे’च्या घोषणा द्यायच्या.
अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. “दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती; ती नाकारली गेली होती.
त्यामुळे साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला लोकांनी विरोध केला. त्यातून “चिपको’ आंदोलन उभे राहिले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले.
गावातील आंदोलकांच्या विरोधानंतरही जंगलातील साधारण अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना असल्याने कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले गेले होते. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले.
एका छोट्या मुलीने झाडे तोडण्यास आलेल्या मजुरांना पाहिले आणि गावात ही खबर दिली. पण, सगळे पुरुष चिमोलीला गेले असल्याने गावात काही स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते. तोपर्यंत जंगलतोड होऊनही गेली असती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात धावल्या.
बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी स्त्रियांना धमक्याही दिल्या. पण, एकीनेही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजुरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आणि यशस्वी झालेलं आंदोलन होतं.
बहुगुणांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वृक्ष तोड वाचवण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर 1980 मध्ये हिरवी झाडे तोडण्यावर 15 वर्षांची बंदी घालण्यात आली. या आंदोलनानंतर बहुगुणा यांनी गांधीवादी मार्गांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी उत्तराखंडमधील भागिरथी नदीवर बांधण्यात येणाऱ्या टेहरी प्रकल्पाविरोधात आंदोलन केले होते. यात ते भागिरथी नदीच्या खोऱ्याजवळ 1995 मध्ये तब्बल 45 दिवस उपोषणाला बसले होते.
तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिलेल्या “धरणामुळे होणाऱ्या पर्यावरणावरील परिणामांचे’ पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. पण त्यावर कार्यवाही होत नसल्याचे पाहून राज घाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीसमोर 74 दिवसांचे पुन्हा उपोषण केले.
त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्वतः या धरणाच्या प्रोजेक्टचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन दिले. पण याच दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. त्याचा निकाल सरकारच्या बाजूने लागल्याने धरणाचे काम 2001 मध्ये पुन्हा सुरू झाले. याच दरम्यान, बहुगुणा यांना 20 एप्रिल, 2001 रोजी अटकही झाली होती.
2004 मध्ये धरणामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली व बहुगुणांचे घरही पाण्यात बुडाले. अखेर 31 जुलै, 2004 मध्ये स्थानिक लोकांसह बहुगुणा यांनाही तेथून कोटी येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर बहुगुणा दांपत्य उत्तराखंडची राजधानी डेहराडूनला स्थायिक झाले. अशा या प्रामाणिक पर्यावरणप्रेमी गांधीवाद्याचे 21 मे रोजी करोनामुळे झाले. आता ही वसुंधरा “सुंदर’ होण्यासाठी आपल्यालाही हातभार लावाला लागणार आहे.