सातारा -साताऱ्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून रविवारी पर्यावरण दिन साजरा होत असताना सातारा पालिकेची वृक्षगणना अद्याप कागदावरच आहे. जिओ टॅगिंगसह हेरिटेज वृक्षांचे कोडिंग पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. मात्र, सातारा शहराची वृक्षसंपदा देखभालीअभावी धोक्यात आल्याची पर्यावरण तज्ज्ञांची सूचना आहे. वृक्षगणनेचे लवकरच टेंडर काढले जाणार असल्याचे प्रशासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले आहे.
एकूण जमीन क्षेत्राच्या 33 टक्के वृक्ष आच्छादन त्या क्षेत्राला असावे म्हणजे तेथील पर्यावरण सुरक्षित आहे असा एक संकेत पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. सातारा शहर परिसरात एका सर्व्हेच्या माध्यमातून तब्बल 40 हजार वृक्ष असल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये हद्दवाढीतील साडेनऊ हजार झाडांचा समावेश आहे. मात्र, साताऱ्यात 50 वर्षापेक्षा वय असणारे हेरिटेज वृक्ष असून त्यांची योग्य देखभाल होत नाही. अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर स्मृति उद्यानामध्ये चंदन, सुबाभूळ आणि सागवान अशी 50 वर्षे वय असणारी तब्बल 52 झाडे आहेत. मात्र, वृक्ष विभागाकडे एकच कर्मचारी असल्याने या वृक्ष संपदेची म्हणावी तशी देखभाल करता येत नसल्याचे स्पष्ट होते. वृक्ष विभाग हेरिटेज वृक्षांची साधे जिओ टॅगिंगसुद्धा करू शकत नाही. तसा प्रस्तावही वृक्ष विभागाने तयार केलेला नाही.
मात्र, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशाप्रमाणे आता वृक्षगणना व त्या माध्यमातून जिओ टॅगिंग आणि ड्रोनद्वारे सर्वेक्षण तसेच वृक्षांना विशिष्ट नंबर देणे, त्या झाडांचे जतन, संवर्धन आणि संरक्षक जाळ्या बसणे अशा विविध कामांचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या पद्धतीने सातारा पालिका आता तयारीला लागली आहे. मात्र, रविवारी पर्यावरण दिनाचे विविध कार्यक्रम होत असताना सातारा पालिकेने वृक्षारोपणाव्यतिरिक्त दुसरा कोणताही ठोस कार्यक्रम ठेवलेला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट
वसुंधरा अभियानाचा पुरस्कर स्वीकारण्यासाठी मुंबईत रवाना होत असताना दुसराकीडे वृक्ष विभागाचे अधिकारी प्रणव पवार मात्र बाहेरगावी रवाना झाल्याचे समजते. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ टॅगिंग आणि वृक्षांना क्रमांक देणे यासंदर्भात लवकरच निविदा काढली जाणार असून प्रत्यक्ष गणनेचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल असा अंदाज असल्याचे पालिकेच्या काही सूत्रांनी सांगितले.
====================