नवी दिल्ली – कॉंग्रेस मधील असंतुष्ट जी-23 गटांच्या नेत्यांशी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चेची प्रक्रिया सुरूच आहे. नेत्यांनी संघटनात्मक बदलांची मागणी जोरदारपणे लाऊन धरल्यानंतर सोनिया गांधी यांनी असंतुष्ट गटातील नेत्यांना सांगितले की या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत,संघटनेत कोणतेही मोठे बदल शक्य होणार नाहीत.
सोनियांचा हवाला देत सूत्रांनी सांगितले की, ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यावर लक्ष केंद्रित करा. तोपर्यंत मी काही प्रमाणात बदल करू शकते असे त्या म्हणाल्या.
पक्षात निर्णय घेणारे नेते त्याच्या परिणामांची जबाबदारी मात्र घेताना दिसत नाहीत हा मुद्दा कॉंग्रेस नेत्यांनी सोनियांशी झालेल्या चर्चेत उपस्थित केला.पक्षातले काही मोजके लोक राहुल गांधी यांच्या नावाने निर्णय घेताना सध्या दिसत आहेत पण या लोकांनी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यावर विचार करण्याचे आश्वासन सोनियांनी त्यांना कालच्या बैठकीत दिले. गांधी यांनी सांगितले असे सूत्रांनी सांगितले. जी 23 गटाच्या नेत्यांचा राग रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यावर आहे.असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान कॉंग्रेस नेत्यांमधील दरी कमी करण्यासाठी आता स्वता सोनिया गांधी या पुढे सरसावल्याचे मानले जात आहे.