कोल्हापूर – गेल्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन 100 रुपये साखर कारखान्यांनी द्यावे, तसेच एसएसपी अंतर्गत प्रतिटन 300 रुपये शासनाने देण्याची मागणी फेटाळण्यात आल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या माध्यमातून आज (23 नोव्हेंबर) पुणे-बंगळूरु महामार्गावर चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
पुणे-बंगळूरु महामार्गावर राजू शेट्टी यांचा मुक्काम असल्याने आता साखर कारखान्यांनीही दराची कोंडी फोडण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सारखर कारखाने आणि सरकारशी वाटाघाटी निष्फळ ठरल्याने राजू शेट्टी आता आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी पुणे-बंगळूरु महामार्गावर ऊस प्रश्नी त्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सकाळी अकरापासून महामार्गावर मिळेल त्या मार्गाने जमण्याचा आदेश दिले होता. कोल्हापूर येथील शिरोली पुलाजवळ हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
साखर कारखान्यांनीही आता दराची कोंडी फोडण्यासाठी तयारी दर्शविली आहे. मात्र त्यांनी गेल्यावर्षीची मागणी करू नका, अशी अट घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार 100 रुपये देण्यास तयार झाले आहेत. मात्र, राजू शेट्टी यांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे. गेल्यावर्षीचे म्हणून 100 रुपये द्या, या भूमिकेवर राजू शेट्टी ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत महामार्ग सोडणार नसल्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे.
पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु
चक्काजाम आंदोलन सुरू केल्यानंतर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. आंदोलनस्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.