“आज ते काम करायचं होतं… परंतु खूप कंटाळा आला आहे, बघू उद्या करूया.’ असे शब्द अनेकदा आपल्या तोंडून बाहेर पडतात. किंवा बरेचदा कोणाच्यातरी तोंडून आपल्या कानावर पडतात. या वाक्यातून आपल्या थकल्याभागल्या मानसिकतेचे दर्शन घडत असते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर यातून आळशीपणा दिसून येतो. एखादवेळेस हे घडले तर मात्र तो अपवाद असेल. परंतु जर हे वारंवार घडत असेल तर आळसाला आपण आपला जिवलग मित्र बनविले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
आपण लहानपणापासून किंबहुना शालेय जीवनापासून ऐकत आलो आहे की, आळस हा माणसाचा शत्रू आहे. परंतु काळाच्या ओघात या सुविचारालाच शत्रू मानून आळस कधी आपला मित्र होतो हे कळतही नाही, आणि एकदा आळस मित्र झाला की आपले फ्रेंड सर्कल अधिकच विस्तारित होत जाते. नकळत या फ्रेंड सर्कलमध्ये अपयश, चालढकलपणा,बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि नकारात्मकता असे मित्र आपल्याला जॉइन होतात. तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, ध्येयवाद, सक्रियता आणि सकारात्मकता हे आपले कट्टर शत्रू बनतात. आळसाला शत्रू मानले तरी हा शत्रू आपल्याला अनेकदा हवाहवासा वाटत असतो. आपण ज्या गोष्टींना खतपाणी घालतो त्याच गोष्टी आपले भविष्य ठरवित असतात.
मराठीत एक सिनेमा आहे- मुळशी पॅटर्न. ज्यात मानवी जीवनातील वास्तव गुन्हेगारीवर भाष्य केले होते. अगदी त्याचप्रमाणे या आळशी मनोवृत्तीच्या लोकांवर बोलायचे झाल्यास निश्चितच अपयशाचा “आळशी पॅटर्न’ म्हणावे लागेल. या सिनेमाच्या भाषेतच बोलायचे झाल्यास या आळशीपणाबाबत विचारणा केल्यास उत्तर असेल, “आपला पॅटर्नच वेगळा आहे… आपण काम नाही आराम करतो तो पण मनसोक्त.’ हा गमतीचा भाग झाला. परंतु या आळशी वृत्तीला वेळीच थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा याचे दुष्परिणाम आपल्याला दीर्घ काळापर्यंत भोगावे लागू शकतात.
अनेकदा आळस हा सवयीने नाही तर मजबुरीने निर्माण होत असतो. एखादे चौकटीबाहेरचे किंवा नावडते काम करताना हमखास कंटाळवाणे वाटते. अनेकदा आपल्या दृष्टीने त्या कामाचे महत्त्व कवडीमोल असल्यानेदेखील आपण आळसाला प्राधान्य देतो. परंतु आळस हा यशस्वी, ध्येयवादी जीवनासाठी निश्चितच फलदायी नाही. आळसाचा शिकार होणे केव्हाही घातकच. त्यामुळे याबाबत वेळीच योग्य पावले उचललेली बरी. या आळशी पॅटर्नपासून सुटका होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.
इच्छाशक्ती जागृत करणे
कोणतेही काम करण्यासाठी आपल्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी. ते काम आवडीचे असो वा नसो परंतु काम हे ध्येय समजून कृती व्हायला हवी. यासाठी आपल्या मनाला त्या कामाबाबत नेहमी सकारात्मक सूचना आपण द्यायला हव्यात.
ऊर्जा व वेळेचे नियोजन
कोणतेही काम करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा असावी लागते. मग ती शारीरिक असो वा मानसिक. आपल्याला ऊर्जेचे व्यवस्थित नियमन करता आले पाहिजे. दैनंदिन जीवनातील कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे ऊर्जा वापरता आली पाहिजे. महत्त्वाच्या कामासाठी ऊर्जा नसल्यास त्या कामाचे महत्त्व कमी होते. परिणामी हाती असलेली संधी आपल्याकडून डावलली जाते. त्यामुळे ऊर्जेचे, वेळेचे नियोजन आणि नियमन सुयोग्य व्हायला हवे. त्यामुळे कामात कंटाळा जाणवत नाही.
काम जोमाने सुरू करा
अनेकदा आपण एखादे काम करायचे म्हणून करतो. कधी एकदाचे हाती घेतो आणि कधी एकदाचे संपवितो असे होते. परंतु या झटपट उरकण्याच्या वृत्तीने ते काम योग्यरीत्या संपन्न होत नाही. त्यामुळे काम संपविण्यापेक्षा ते जोमाने सुरू करण्यावर भर द्या. यामुळे आळस न येता ते काम दोषमुक्त पूर्ण होईल.
कल्पकता आणा
अनेकदा तेच ते काम करून कंटाळा येत असतो अशावेळी कामात नावीन्यता आणा. तेच काम वेगळ्या पद्धतीने कल्पकतेने करण्याचा प्रयत्न करायला हवा.
काम नाही, आव्हान समजा
आव्हान स्वीकारून ते पार पाडणे प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे जे काम करताना आळस येतो त्या कामाला काम न समजता आव्हान समजा. त्या आव्हानाकडे एकाग्रतेने लक्ष देऊन त्याची पूर्तता करा. मग बघा आळसाची भावना तुमच्या जिद्दीपुढे सपशेल लोटांगण घेईल. आळशी पॅटर्नमुक्त होण्यासाठी आपल्याला अशा अनेक गोष्टी करता येतील. फक्त आपण आपल्या मनात सकारात्मकता आणि इच्छाशक्तीची भावना प्रज्वलित केली पाहिजे. चला तर मग या आळशी पॅटर्नवर मात करून यशाच्या उत्साही पॅटर्नचा आरंभ करूया.
सागर ननावरे