सुरक्षिततेची मार्गदर्शिका लागू झाल्याचा परिणाम
श्रीनगर – प्रशासनाने विशेष मार्गदर्शिका लागू केल्यामुळे पर्यटक आणि अमरनाथ यात्रेकरूंना जम्मू काश्मीरमधून काढता पाय घ्यावा लागतो आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना काश्मीरमधील मुक्काम अटोपता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. हवाई दलाच्या विमानांना आवश्यकतेनुसार पाचारण करण्यात येत असल्याचे श्रीनगर विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष मार्गदर्शक सूचन लागू झाल्याबरोबर जम्मू काश्मीर पर्यटन विभागाने वेगवेगळ्या पर्यटन स्थळी बस पाठवल्या आणि सर्व पर्यटकांना श्रीनगरला आणण्यास सुरुवात केली गेली, असे काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक निसार वाणी यांनी सांगितले. शुक्रवारी मार्गदर्शक सूचना लागू झाल्या तेंव्हा काश्मीरमध्ये 20 ते 22 हजार पर्यटक होते. त्यापैकी बहुतेक पर्यटक श्रीनगरला पोहोचले आहेत किंवा काही जणांनी काश्मीर खोरे सोडले आहे.
मात्र अजूनही काही पर्यटक जम्मू काश्मीरमध्येच आहेत. काही पर्यट्क पहलगाम येथे गिर्यारोहणासाठी गेलेले आहेत. ते अद्याप बेसकॅम्पवर परत आलेले नाहीत. बेसकॅम्पवर ते परत आल्याबरोबर त्यांना माघारी जाण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही वाणी यांनी सांगितले.
जे पर्यटक वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये मुक्कामाला राहिले होते. त्यांना तेथून बसने एकत्र करून सकाळी विमानतळावर सोडण्यात आले. एरवी या कालखंडात बुकिंग नसलेल्या विमानांमध्ये त्यांच्यासाठी जागा करून देण्यात आली. तर 300 प्रवाशांना हवाई दलाच्या विमानातून परत पाठवण्यात आले. पर्यटकांना परत पाठवण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. अचानक परत जावे लागणे अनेक पर्यटकांना रुचलेले नाही. बरेच व्यवसायिकही यामुळे नाराज झाले आहेत.
प्रवाशांन अचानक परत जावे लागण्याने काही विमान कंपन्यांनी श्रीनगरपासून आणि श्रीनगरपर्यंतच्या तिकीटांच्या दरात कपात केली. पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेवर केंद्राच्या या मार्गदर्शिकेने पाणी फेरल्याची प्रतिक्रिया काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शेख आशिक यांनी म्हटले आहे.