मुंबई – राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर असलेलं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. आता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी केला आहे. रेड अलर्टमध्ये राज्यातील ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये कोकणातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उद्या २२ जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
तर २३ जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/1QjQQAdpOH
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 21, 2021
दरम्यान 24 जुलै रोजी राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. त्या दिवशी राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच 25 जुलैसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.