टोकियो (दि. 24) – टोकियो पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरू होण्यापूर्वी काही तास आधी भारतीय पथकासाठी धक्कादायक बातमी समोर आली. गत पॅरालिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व यंदाच्या स्पर्धेतील भारताचा ध्वजधारक मरियप्पन थंगवेलू याच्यासह एक खेळाडू व अन्य चार व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यामुळे त्यांना तातडीने विलगीकरणात पाठवले गेले आहे.
मंगळवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. मात्र, त्यात मरियप्पनसह अन्य काही जणांना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. अर्थात, त्यांना जरी विलगीकरणात पाठवले गेले असले तरीही त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे संयोजकांनी सांगितल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मरियप्पनसह आणखी एक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील अन्य चार व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने आता या
स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उद्घाटन सोहळ्यात बाधित खेळाडू व व्यक्तींना सहभाग घेता आला नसला तरीही भालाफेकपटू टेक चंद हा भारताचा ध्वजवाहक म्हणून सहभागी झाला होता. या सर्वांना टोकियोला रवाना होत असतानाच करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मरियप्पन आणि विनोद कुमार या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील अन्य चार अशा एकूण सहा जणांना आता विलगीकरणात पाठवले गेले आहे. त्यांची वारंवार चाचणी करण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतरच त्यांचा विलगीकरणाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती भारतीय पथकाचे प्रमुख गुरुशरण सिंग यांनी दिली आहे. या स्पर्धेत तब्बल 162 देशांचे संघ सहभागी झाले असून, आगामी 13 दिवस 22 क्रीडा प्रकारांत एकूण 540 गटांत सामने होतील. या
स्पर्धेत तब्बल 4 हजार 400 खेळाडू सहभागी झाले आहेत. भारताचे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत जास्त 54 खेळाडू यंदा सहभागी झाले असून तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, कयाकिंग, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो या खेळात पदकाची अपेक्षा आहे. यंदाच्या भारतीय पथकात 40 पुरुष, तर 14 महिला खेळाडूंचा सहभाग आहे.