स्वातंत्र्यसैनिक, फॉरवर्ड ब्लॉकचे नेते बॅ. शरदचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ओरिसातील कटक येथे 6 सप्टेंबर 1869 रोजी झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे मूळचे बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील कोडालिया येथील रहिवासी होते.
वकिलीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी कटक येथे वकिली व्यवसाय सुरू केला.ते ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. तसेच ते स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांना एकूण 8 मुलगे व 6 मुली अशी 14 अपत्ये झाली, त्यापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस व बॅ. शरदचंद्र बोस आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनीलचंद्र बोस ही त्यांची मुले सर्वश्रुत आहेत.
शरदचंद्र यांनी कोलकाता येथे प्रेसिडेन्सी कॉलेज व स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी वर्ष 1911मध्ये इंग्लंडला गेले. त्यांनी लिंकन्स इनच्या बारमध्ये बॅरिस्टर पदवी संपादन केली. त्यानंतर भारतात परतल्यावर कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला. त्याचवेळी देशात भारतीय स्वातंत्र्यचळवळ सुरू झाली व त्यात सामील होण्यासाठी त्यांनी वकिली सोडून दिली. सी. आर. दास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनास सुरुवात केली.
काँग्रेसच्या अहिंसेवर विश्वास असूनही त्यांना क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती होती. वर्ष 1936 मध्ये, बोस बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले तसेच विधानसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते. 1936 ते 1947पर्यंत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम केले.
वर्ष 1946-1947 मध्ये त्यांनी केंद्रीय विधानसभेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. वर्ष 1946 मध्ये अंतरिम सरकारमधे जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत त्यांची खनिजमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तथापि, हिंदू-बहुल आणि मुस्लीम-बहुल प्रदेशांमध्ये बंगालची फाळणी करण्याच्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या आवाहनावर मतभेद झाल्याने बोस यांनी अखिल भारतीय काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी बंगाली मुस्लीम लीगचे नेते हुसेन शहीद सुहरावर्दी आणि अबुल हाशिम यांच्यासमवेत संयुक्त बंगाल आणि ईशान्य भागासाठी नवीन प्रांत तयार करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकचे नेतृत्व केले आणि बंगाल तसेच भारतासाठी समाजवादी व्यवस्थेची मागणी करीत सोशॅलिस्ट रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली.
वर्ष 1909 मध्ये विभावती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना 8 अपत्ये झाली. त्यापैकी अशोकनाथ बोस जर्मनीतील रसायनशास्त्रात डॉक्टरेट आणि प्रख्यात अभियंता होते. त्यांचे दुसरे पुत्र अमियानाथ बोस संसद सदस्य झाले. 20 फेब्रुवारी 1950 रोजी कलकत्ता येथे शरदचंद्र बोस यांचे निधन झाले. शरदचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ कलकत्ता उच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारला आहे.