सातारा -जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात एक हजार 765 पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी टॅंकरग्रस्त गावांमध्ये प्राधान्याने ही योजना राबवण्यात आली असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हास्तरीय कार्यशाळा व जिल्ह्यातील 859 पाणी पुरवठा योजनांचा ई भुमीपूजन सोहळा बुधवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास खा. श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, आ. अरूण लाड, आ. महादेव जानकर, आ. जयंत आसगावकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची प्रमुख उपस्थिती असल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गुणवत्तापूर्ण पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. प्रत्येक गावात पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे, पाणी योजना अंमलात आणून भविष्यकालीन विचार करुन योजना राबवण्यात येत आहेत. पाणी योजनांची वीज बिले भरण्याचा प्रश्न अनेक ग्रामपंचायतींना भेडसावण्याची शक्यता गृहित धरुन जिल्ह्यात 202 ठिकाणी सोलर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेअंतर्गत चार तालुक्यांतील 45 साठवण टाक्यांच्या 25 कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याची निविदा कार्यवाही सुरु असल्याचे खिलारी यांनी सांगितले.