मुंबई – शहरी भागातील महिला आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे असले तरी त्यांना स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार असून, महिला धोरणात महिलाविषयक कायदे व त्याची अंमलबजावणी आणि जनजागृतीवर भर देणार आहे.असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
विधानभवन येथे 4 थ्या महिला धोरणाच्या प्रारूपावर सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार मंजुळा गावीत, गीता जैन, आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, महादेव जानकर, संजयमामा शिंदे, प्रताप अडसड, अरूण लाड, भिमराव केराम, महिला आयोग सदस्य ॲड.संगिता चव्हाण, सचिव आय.ए. कुंदन उपस्थित होते.
मंत्री यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, महिला धोरणातील कलमांची अंमलबजावणी किती दिवसात केली जाईल, अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या कोणत्या विभागाची असेल, या मुद्द्यांचा समावेश धोरणातच करण्यात येणार आहे. सर्व स्तरातील महिला आणि एलजीबीटीक्यू (तृतीयपंथी, समलैंगिक आदी) वर्गासही या धोरणामध्ये स्थान देऊन त्यांच्या कल्याणाचाही विचार करण्यात आला आहे, असेही मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी प्रास्ताविकात सांगितले, या धोरणाच्या मसुद्याबाबत नऊ समित्या तयार करण्यात आल्या. या समितीतील सदस्यांचे अभिप्राय आणि सूचना या मसुद्यात घेतले आहेत. या धोरणाचा मसुदा विविध शासकीय विभाग, विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, सामान्य नागरिक यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला. सर्व क्षेत्रातून प्राप्त अभिप्राय एकत्र करून मसुदा तयार करण्यात आला आहे.
बैठकीस सहसचिव श.ल. अहिरे, महिला व बालविकासचे आयुक्त राहुल मोरे, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.