कोलकाता – आगामी 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस पक्ष कुणासोबतही जाणार नाही. तृणमूलची युती जनतेसोबत असेल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. यामुळे विरोधकांच्या ऐक्याला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ममत बॅनर्जी यांनी गुरुवारी नवण्णा येथे पत्रकार परिषद घेतली. त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळातून चर्चेचा विषय ठरले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी 2024 लोकसभा निवडणुकीत कुणाशीही युती करणार नाही. तृणमूलची युती लोकांसोबत असेल. तसेच तृणमूलला कॉंग्रेस किंवा सीपीएमचे ऐकण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सागरदिघी पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. तृणमूलचा पराभव करून डाव्या-कॉंग्रेस आघाडीने विजय मिळवला. भाजपही तृणमूलच्या विरोधात डाव्या-कॉंग्रेस आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहे. डाव्या-कॉंग्रेस आघाडीलाही यावेळी ममत बॅनर्जी यांनी “अनैतिक’ म्हटले आहे.
भाजप, सीपीएम आणि कॉंग्रेस आपसात मतांची अदलाबदल करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. भाजपच्या मदतीने आपण आपल्याच विरोधात आहोत, असे म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.