नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा सुरू करण्याची वेळ आली असून आपल्याला करोना विषाणू सोबतच जगण्याची तयारी करावी लागेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीत आतापर्यंत 4122 जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील 1256 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर 64 जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.
हॉस्पिटल्स आणि किटसच्या संदर्भात बोलायचे झाले तर आमची पूर्ण सज्जता असल्यामुळे कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत दिल्लीतील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील, असे संकेत केजरीवाल यांनी दिले. कंटेनमेंट भाग तसाच सील राहावा. मात्र अन्य भाग ग्रीन झोन समजून तेथील व्यवहार सुरू केले जावेत, असे आम्ही केंद्र सरकारला सांगणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.
लॉकडाउन पूर्णपणे हटविल्यानंतरही जर समजा काही रुग्ण वाढले तर हॉस्पिटल आणि किटसबाबत आमची पूर्ण तयारी आहे.त्यामुळे आम्ही त्याचा मुकाबला करू शकू. 33 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालयांना परवानगी दिली जाईल, तर जिवनावश्यक वस्तूंसह हार्डवेअर, आयटी आदींनाही परवानगी दिली जाईल, असे ते म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहील मात्र खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांना परवानगी देता येउ शकते, असेही त्यांनी सांगितले.