रमेश जाधव
रांजणी – समाज कार्य, समाज सेवा या बरोबरच पद, प्रतिष्ठा आणि पैसा हेच राजकारणाचे समीकरण झाल्याचे आजच्या काळात दिसून येते. सर्व सामान्य जनतेप्रती असलेली राजकारण्यांची बांधिलकी फक्त सेवाभावी वृत्ती दाखवण्यापर्यंतच मर्यादित नसते तर त्याला कृतीचीही जोड लागते हे हेतुपुरस्सर विसरत चाललेली पिढी समाजाला काय दिशा देणार?
दरम्यान पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून 21 मार्चपासून त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांना आपल्या प्रचारासाठी आणि मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भरपूर कालावधी मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष प्रबळ असले तरी, सध्या भाजपाही आपले अस्तित्व सिद्ध करत असल्याचे दिसून येते. असे असले तरी तालुक्या अंतर्गत होणारे सामाजिक किंवा सेवाभावी कार्यक्रम हे पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार करीत असून वरिष्ठांची मर्जी संभाळून आपले तिकीट वर्णी लावण्याची धडपड चालू आहे.
स्थानिक पातळीवरील युती आघाडीचा निर्णय आगामी स्वतंत्र निवडणूका लढण्याची तयारी सर्वच पक्षातील इच्छुकांनी केली असून आपल्यालाच उमेदवारीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून त्यांच्या मार्फत स्थानिक पातळीवर विकासकामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कामासाठी लगबग सुरू आहे. त्या निमित्ताने स्वतःचे अस्तित्व आणि उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत.
प्रसंगी बंडखोरीची तयारी
इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी चालू असून सर्वच बाजुंनी ताकद लावली आहे. निवडणुकाची घोषणा आणि कालावधी जाहीर होणे बाकी असले तरी सर्वच पक्षातील संभाव्य इच्छुक उमेदवारांनी विरोधकांना अडचणीत आणून नामोहरम करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे.
त्यासाठी आश्वासन दिलेल्या आणि अपूर्ण कामांची यादी, गावानुसार मतदार याद्या, पत्रके, आगामी कामांचे संकल्प, स्लोगन, गाणी यांची तयारी पूर्ण झालेली असून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी किंवा अपक्ष निवडणूक लढण्याचीही तयारी सर्वच पक्षातील इच्छुकांनी केली असून तालुक्यात आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहायला लागले असून आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगणार हे मात्र स्पष्ट आहे.