संगमनेर -फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी आंदोलने करण्याची वेळ आली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना आ. विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राज्यातून 16 मते द्रौपदी मुर्मू यांना पडली हे त्याचेच द्योतक आहे. सरकारमध्ये असताना कॉंग्रेस पक्ष आपले अस्तित्व दाखवू शकला नाही. आता सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरू झालेली आंदोलने ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती उरली आहेत. भविष्यात जनताच आता त्यांना बुस्टर डोस देणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज्यात मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल या प्रश्नावर आ. विखे पाटील म्हणाले की, याबाबतचे सर्व निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर होतील. त्यामुळे मी अधिक बोलणे उचित होणार नाही. मंत्रिमंडळ नसले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही राज्याकडे बारीक लक्ष आहे. प्रशासनाचे काम व्यवस्थित सुरू आहे. राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोघांनीही तातडीने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारे ठरल्याचे सांगून विरोधकांनी फार चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.