शिक्रापूर -येथील सर्वात मोठी समस्या असलेला कचरा प्रश्न अनेक दिवसांपासून धुपत आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा अवलंबविला होता, त्यांनतर ग्रामसभेत संतप्त पडसाद उमटून देखील यावर तोडगा निघाला नाही.
रात्रीच्या सुमारास कचरा पेटविला जात असल्याने शिक्रापूर ग्रामपंचायतचा “रात्रीस खेळ चाले’ अशी प्रचीती येत आहे. कचरा पेटविण्याचे सत्र सुरू झाल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिक्रापूर येथील सर्व कचरा वेळ नदीच्या कडेला टाकून त्या ठिकाणीच कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. नदी प्रदूषण होऊन नागरिकांच्या पाण्याचा तसेच पेटविल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी कचरा गाड्या अडवून समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यानंतर ग्रामसभेमध्ये काही ग्रामस्थांनी कचरा घेऊन प्रवेश करत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कचरा भेट देऊन निषेध व्यक्त केला होते. लवकर कचरा प्रश्न सोडविला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
यावेळी लवकरच खासगी कंपनीला बोलावून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सरपंच जयश्री भुजबळ यांनी सांगितले होते. मागील आठवड्यात गट विकास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले. त्यांनतर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कचरा प्रकल्प उभारण्याबाबत आदेश दिले. मात्र, ग्रामपंचायतीने निर्णय घेतला नाही. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पत्राचे वाचन केले असता सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यावर मौन बाळगले.
आज रात्रीच्या सुमारास कचरा पेटवून देण्यात आला. त्यामुळे संपूर्ण शिक्रापूर गाव धुरामध्ये हरविले आहे. त्यांनतर सकाळी अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेळ नदीच्या पाण्यामध्ये मोटार टाकून पाण्याच्या सहाय्याने कचऱ्याची आग विझविली आहे. ग्रामपंचायत नागरिकांची दिशाभूल करत असून आठ दिवसांमध्ये यावर तोडगा न काढल्यास गावातील महिलांचा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर नेणार असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मौन का ?
शिक्रापूर येथील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आलेले असताना सदर आदेश बाबतचा विषय ग्रामविकास अधिकारी यांनी मासिक बैठकीत घेतलेला असताना देखील उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे मौन का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित पणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना तसेच वरिष्ठ कार्यालयांकडून कचरा समस्या सोडविण्याबाबतचे आदेश आलेले असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र आता गप्प न बसता ग्रामपंचायत प्रशासनावर गुन्हे दाखल करणार आहे.
– रवींद्र भुजबळ, उद्योजक, शिक्रापूर.
शिक्रापूर येथील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी जागेची सोय झालेली नाही. यापूर्वी जागा उपलब्ध झालेली होती. मात्र, तेथे विरोध झाला आहे. परंतु पुन्हा शासनाकडे जागा व निधीची मागणी केलेली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर कचरा प्रश्न सोडविणे शक्य होईल.
– गुलाब नवले, ग्रामविकास अधिकारी, शिक्रापूर.