श्रीकांत कात्रे
आपली स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड अनेकांना यशाचा मार्ग दाखवते. प्रीतम जाधव यांनीही अशाच प्रयत्नांतून अनेक व्यवसायांतून स्थिरता मिळविण्यासाठी मेहनत घेतली. अखेर विविध 60 हून अधिक प्रकारची लोणची तयार करण्याच्या व्यवसायाने त्यांना यशस्वी ओळख दिली. संघर्षाशिवाय पर्याय नाही, या मंत्राने जिद्दीने वाटचाल करत त्यांनी व्यवसाय वाढविला. या व्यवसायातील मोठी स्पर्धा लक्षात घेऊन आपले वेगळेपण टिकवत त्यांनी आर्थिक स्थिरता मिळवली. त्याशिवाय त्यांच्या या वाढत्या व्यवसायामुळे काही गरजू महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे
लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, मग ते कैरीचं असो की लिंबाचं. अशी विविध प्रकारचं साठहून अधिक प्रकारांचं चटकदार लोणचं मिळालं तर? हो… असं लोणचं मिळू शकतं. लातूरच्या प्रीतम जाधव अशी विविध प्रकारांची लोणची तयार करतात. करोनाच्या संकटात अनेकांनी संघर्ष केला. त्याच काळात घरात राहून काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रीतम जाधव यांनी या व्यवसायातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
करोना काळात आरोग्यदायी अन्नाचे महत्त्व सर्वांना पटू लागले होते. लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज व्यक्त होत होती. त्यामुळे आरोग्यवर्धक अन्नाची गरज लक्षात घेऊन आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रीतम यांनी कोणत्याही प्रकारचे केमिकल घटक न वापरता लोणच्याचे उत्पादन करण्याचे निश्चित केले. त्यापूर्वी त्यांनी केक व इतर खाद्यपदार्थ तयार केले होते. संकटाच्या वेळी महिलांना पापड, लोणची करायला सांगितले जाते. पण वेगळी संकल्पना घेऊन मोठ्या प्रमाणावर लोणचे तयार करण्याचे त्यांनी ठरविले. या व्यवसायत ब्रॅंन्डेड कंपन्यांची स्पर्धाही त्यांनी लक्षात घेतली. मशिनरीचा उपयोग न करता फळे व भाज्यांचे लोणचे तयार करण्यासाठी सर्व प्रक्रिया हाताने करण्यावर त्यांनी भर दिला. लोणच्याच्या प्रकारानुसार घरगुती घाण्याचे करडई, सोयाबीन, मोहरीचे तेल याचा उपयोग त्यांनी केला.
कोणत्याही प्रकारचे केमिकल प्रिझर्व्हे टिव्ह न वापरता लोणचे नैसर्गिकरित्या टिकण्यासाठी हिंग, तेल, हळद, मीठ असा वापर त्या करतात. बाटल्यांमध्ये पॅकेजिंग करून प्रेस करून झाकण लावण्याचेही काम त्या करतात. केमिकल नसल्यामुळे त्याची न्युट्रीशन व्हॅल्यू वाढते. लॉकडाऊनमुळे उत्पादनाचे मार्केटिंग कसे करायचे हा प्रश्न होता. तथापि, सोशल मीडियावरून केलेल्या जाहिरातीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय महिला सबलीकरणासारख्या सामाजिक कार्यातही प्रीतम आघाडीवर आहेत. त्याचाही त्यांना फायदा झाला. एका वर्षांतच त्यांनी सहा हजार किलो लोणचे विकले. हे काम करण्यास सुरवातीला त्यांनी विरोधही पत्करला होता. पण संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. बी. कॉम. पर्यंत शिक्षण झालेल्या प्रीतम यापूर्वी शाळेत शिक्षिका होत्या. कापड उद्योगातही त्यांनी काम केले. ब्रॅंन्डेड मातीची भांडी विकण्याचा त्यांनी व्यवसाय केला. बसून राहयचे नाही, या अस्वस्थतेतून त्या कार्यरत राहयच्या. परंतु, योग्य मार्ग मिळत नसल्याने स्थिरता लाभत नव्हती. लोणची उत्पादनातून ती स्थिरता त्यांना लाभली.
आता त्या कैरी, लिंबू, मिरची, लसूण, कारले, गाजर, आवळा, मोड मेथ्या, ओली हळद, टोमॅटो, केर सांगरी, मिक्स भाज्या, काबोली चना व वाटाणा, आवळा कैरी चुंदा, शेवगा, वांगे, कांदा, माईनमुळा, चिंच, मटण, कोल्हापुरी मटण, चिकन, प्रॉन्स लोणचे अशी साठहून अधिक प्रकारांची लोणची तयार करतात. त्याच्या घटकांचे फार्म्युले त्यांनी स्वतः तयार केले आहेत. काही महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विविध प्रकारच्या चटकदार लोणच्यांची निर्मिती करताना त्यांनी स्वतः संशोधन केले. लोकांना आवडणारी चव कायमस्वरूपी एकसारखीच असली पाहिजे, यासाठी त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळेच एकदा या लोणच्याचा आस्वाद घेतला की ग्राहक त्यापासून दूर जात नाही, असा अनुभव त्यांना मिळत गेला.
सुरवातीच्या काळात सोशल मीडियावरून मार्केटिंग केले. आता त्यांनी स्वतः चे आऊटलेट काढले आहे. सामाजिक कार्यामुळे आणि अल्पावधीत लोणची उत्पादनात मिळालेल्या यशामुळे प्रीतम जाधव या नावाने ओळखण्याऐवजी त्यांना सुगरणीचे लोणचे या नावाने ओळखले जाते, असे त्या सांगत होत्या. अर्थातच त्यांनी हे यश मिळविण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.
स्वतःचाच व्यवसाय असल्यामुळे 24तास त्या कामातच रममाण असतात. झोपेल तेवढीच शांत असते, ध्येय ठरविले की ते पूर्ण करायचे या जिद्दीनेच त्या काम करत राहतात. या प्रवासात माणदेशी फाउंडेशनचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे त्या सांगतात. इथून पुढील काळात हा व्यवसाय त्यांना अधिक वाढवायचा आहे. त्यासाठी आवश्यक मिक्सर, ग्राइंडर अशी मशिनरी त्यांना घ्यायची आहे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामातून निर्माण झालेला आत्मविश्वास त्यांचे स्वप्न पूर्ण करेल, अशी खात्री त्यांना आहे. खरे तर काही तरी करायचे ही जिद्द यशाच्या मार्गावर नेऊ शकते, हेच त्यांनी सिद्ध केले आहे.