भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याच्याकडे सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, त्याची बेदरकार वृत्ती, आक्रमकता व त्याच ढंगात तो सध्या करत असलेले नेतृत्व हाच चिंतेचा विषय बनला नाही म्हणजे झाले. कारण अशा स्वभावाच्या कर्णधारावर संयमाचे नियंत्रण किंवा लगामही आवश्यक असतो.
अनेक टीकाकारांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये अपयश येत आहे व त्यामागे आक्रमक नेतृत्वाचा अभाव हेच कारण आहे. परंतु केवळ आक्रमक नेतृत्वानेच मोठ्या स्पर्धा जिंकता येत नाहीत तर बेलगाम आक्रमकतेला लगाम असेल तरच सांघिक कामगिरीच्या जोरावर कोणत्याही संघाला पराभूत करत विजेतेपदापर्यंत पोहोचू शकतो. हा
र्दिक पंड्याबाबत बोलायचे तर त्याच्या खेळात तसेच त्याच्या नेतृत्वात आक्रमकता निश्चितच आहे; पण तरीही आपला संघ पराभूत होताना इतक्या वाईट पद्धतीने खेळतो की काही वेळा हाच तो संघ आहे का, असा प्रश्न पडतो. आयपीएल स्पर्धेत एखाद्या संघाचे नेतृत्व करणे व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे यात खूप मोठा फरक आहे. भारतीय क्रिकेटचा इतिहास चाळून पाहिला तर असे लक्षात येते की, अनेक कर्णधारांनी संघाला यश मिळवून दिले; पण आक्रमक नेतृत्वाचा विषय येतो तेव्हा मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर थेट सौरव गांगुलीचेच नाव घेतले जाते. महंमद अझरुद्दीननेही नेतृत्व यशस्वी करून दाखवले, मात्र त्याचा आक्रमक कर्णधार म्हणून कधीही उल्लेख केला गेला नाही.
1999-2000 साली घडलेल्या मॅच फिक्सिंगनंतर संघाची प्रतिमा बदलण्याची खूप मोठी जबाबदारी गांगुलीकडे दिली गेली व त्याने या संधीचे सोने करताना वैयक्तिक कामगिरीसह नेतृत्वाच्या जोरावरही अनेक सामने व स्पर्धा जिंकून दिल्या. त्याच्या हातात तावून सुलाखून तयार झालेला संघ महेंद्रसिंह धोनीला मिळाला व त्याने गांगुलीने रचलेल्या पायावर यशाचा कळस चढवला. त्यानंतर राहुल द्रविड किंवा अनिल कुंबळे यांनीही नेतृत्व केले, मात्र त्यात काहीही दम नव्हता.
अखेर धोनीचा वारसदार म्हणून विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवली गेली व आक्रमक कर्णधाराच्या हातात हा संघ यशस्वी ठरेल असा विश्वासही सगळ्यांनाच वाटत होता. मात्र, त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांच्याशी गांगुलीचे वावडे होते व गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याबरोबर शास्त्री यांनी आपला करार वाढवण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर कोहलीचे शास्त्रींशी जरा जास्तच जुळत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्या हातातूनही नेतृत्व काढून घेतले गेले. हा निर्णय इतक्या घाईने घेतला गेला की कोहलीशी साधा संवादही साधावा असेही कोणाला वाटले नाही. पण प्रत्येक कुकर्माला काळच उत्तर देतो असे म्हणतात तेच घडले व काही दिवसांतच गांगुलीचीही बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली.
गांगुली पदावरून बाजूला झाल्यावर होयबा व नायबा अशा स्वभावाच्या व्यक्तीची तिथे नेमणूक होईल असेच वाटत होते. मात्र, रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली व संघबदलाचेही संकेत मिळाले. त्याच अंतर्गत रोहित शर्माकडून मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व काढून घेतले जाणार व हार्दिक पंड्याकडे ही जबाबदारी दिली जाणार असे सांगितले गेले व घडलेही तसेच. मात्र, हा निर्णय काही मालिकांपुरताच असल्याचे जरी म्हणत असले तरीही ही लॉंगटर्म सेटलमेंट असल्याचे सहज लक्षात येते. कारण बीसीसीआयवरचा मुंबई, कर्नाटक व दिल्लीचा होल्ड केव्हाच संपला आहे. सध्या मुंबईतही गुजरातचेच वारे वाहत असल्याने पंड्याच रोहितच्या जागी कर्णधार असेल व ही मोहीम 2024 सालात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत राहणार यात शंका नाही.
पंड्यासमोरची आव्हाने
पंड्याकडे नेतृत्व दिले जाणे व त्यात त्याची कामगिरी पाहणे हे वाटते तितके सोपे नाही. भारतीय क्रिकेटही आता राजकारणाचा आखाडा बनत आहे, त्यामुळे पंड्याला खूप जपून पावले टाकावी लागणार आहेत. यातील त्याच्यासमोरचे मुख्य आव्हान म्हणजे जेव्हा वरिष्ठ खेळाडू संघात परततील तेव्हा नव्या व जुन्यांचा ताळमेळ राखणे हेच राहणार आहे. त्यातही संघात एकाच वेळी तीन माजी कर्णधार असलेल्या संघाचे नेतृत्व करणे येड्यागबाळ्याचे काम नाही. रोहित शर्मा, विराट कोहली व लोकेश राहुल यांच्याशी जमवून घ्यायचे हे एक दिव्य असेल. कोहली आक्रमक तर रोहित सावध भूमिका घेणारा तर राहुल शांतपणे आपला स्वार्थ साधणारा आहे. पंड्याला या खेळाडूंच्या फलंदाजीच्या क्रमवारीत तसेच त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करणे याचेच दडपण राहील. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे नेतृत्व आले होते तेव्हा संघात कपिल देव, महंमद अझरुद्दीन हे माजी कर्णधार संघात होते, त्यामुळे तेव्हाही सचिनसारखा व्यक्तीही बुजल्यासारखे नेतृत्व करताना दिसत होता. अशीच काहीशी परिस्थिती गांगुली व नंतर धोनीसमोरही निर्माण झाली होती. मात्र त्यांनी यातून अत्यंत रास्त मार्ग काढत यश मिळवून दाखवले होते. हेच आता पंड्याला करावे लागणार आहे.
वैयक्तिक कामगिरीचे काय?
भारतीय संघाच्या कर्णधारपदावर कोणताही खेळाडू आला की पहिल्यांदा त्याच्या नेतृत्वातील यशापेक्षा वैयक्तिक कामगिरीवर जास्त लक्ष दिले जाते. त्याचा सामनाही गांगुली व धोनीने केला आहे. आता पंड्याचा नंबर आला इतकेच. गेल्या काही काळात ज्या काही सामन्यांत किंवा मालिकांमध्ये पंड्याने नेतृत्व केले त्यात त्याची वैयक्तिक कामगिरी फारशी चांगली झाली नाही. पण जोवर संघ जिंकत असतो तोवर कर्णधाराचे सगळे निर्णय बरोबर ठरत असतात, जे धोनीच्या बाबतीत घडले. मात्र, अपयश आले की पहिल्यांदा खापर कर्णधार व प्रशिक्षकावरच फोडले जाते व हाच भारतीय क्रिकेटचा इतिहास आहे. यशाला अनेक नातेवाईक असतात व अपयश एकटे पडते असे म्हणतात ते खरे आहे. त्यामुळे पंड्याला केवळ आपल्या नेतृत्वात संघाला विजय मिळतात की नाही हेच पाहायचे नसून आपल्या कामगिरीलाही सिद्ध करावे लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत पंड्याची वैयक्तिक कामगिरी अत्यंत सुमार झाली आहे.
यंदाच्या तसेच पुढील वर्षात आयसीसीच्या विश्वकरंडकाबरोबरच अन्य मोठ्या स्पर्धा व मालिका होणार आहेत, त्यामुळे केवळ अन्य दहा खेळाडू सरस खेळले तरी चालेल असे होणार नाही, पंड्यालाही आपले अष्टपैलूत्व सिद्ध करावेच लागेल. नवोदित डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 लढतीत सातत्याने नोबॉल टाकल्यावर चिडलेला पंड्या सगळ्यांनीच पाहिला आहे, पण पहिल्या टी-20 सामन्यात आपले एक षटक बाकी असतानाही अखेरचे षटक अक्सर पटेलला देत आपल्यावरची जबाबदारी ढकलतानाही पाहिला गेला आहे. “कॅप्टन ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट’ असे म्हटले जाते व तेच पंड्या विसरला. अक्सरने हा पहिला सामना जिंकून दिल्यावर मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा पंड्या धावत आला व त्याने मिठी मारलेली दिसली. दुसऱ्याने मिळवून दिलेल्या राज्याचा कारभार पाहणे खरे नेतृत्व नव्हे तर स्वबळावर सत्ता मिळवणे महत्त्वाचे असते. अर्थात सध्या भारतात जे चित्र राजकारण, समाजकारणात दिसते, तोच आदर्श पंड्यानेही घेतला असावा. असो.
विंडीज शैलीवर नियंत्रण हवे
पंड्याची देहबोली, त्याचे मैदानातील तसेच मैदानाबाहेरील वर्तन तसेच त्याच्या खेळाची शैली पाहिली की तो वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंसारखाच असल्याचा भास होतो. त्याची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व त्याचा वावरही अगदी तसाच वाटतो. पंड्या हा अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेला खेळाडू आहे. घरची परिस्थिती बेताची असताना त्याने आपल्या खेळातील गुणवत्तेच्या जोरावर आज हे यश प्राप्त केले आहे. मात्र, टिपीकल वेस्ट इंडियन मानसिकतेसारखा प्रचंड इगो व ऍरोगन्सही त्याच्या देहबोलीत जाणवतो व तोच त्याच्या वाटचालीसाठी धोकादायक ठरू शकतो. आज एक क्रिकेटपटू म्हणून तो यशस्वी झाल्यावर त्याच्या जवळच्या वर्तुळातही त्याच्या अहंकारी स्वभावाचे वर्णन केले जाते. खूप प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्यावर मिळालेले यश खरेतर कौतुकास्पद आहे. मात्र, त्याला संयमाचे कोंदण हवे. बेदरकार प्रवृत्तीला तंत्रशुद्धता व संयमाचे कोंदण असेल तर त्या खेळाडूचा सर वीव्हियन रिचर्डस होतो. संघाचे नेतृत्व, वैयक्तिक कामगिरी, वावर तसेच कर्णधार म्हणून निर्णय घेताना याच आक्रमकतेवर नियंत्रणही राखले गेले तरच पंड्या यशस्वी कर्णधार ठरेल.
अमित डोंगरे