शिक्रापूर, {शेरखान शेख} – राज्यभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना सर्वांचे लक्ष शिरुरच्या जागेकडे लागलेले आहे. राष्ट्रवाडीच्या दोन्ही गटांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. निवडणूक दुहेरी होणार असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, नुकतेच वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केल्याने निवडणुकीत रंगत येऊन नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिरुरच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काही राजकीय स्थित्यांतरे झाल्याने राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले. मंगलदास बांदल यामुळे कोणत्याही पक्षात जाहीर गेले नाही.
दरम्यान, शरद पवार गटाने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली असतानाच शिवसेनेची ही जागा अजित पवार गटाला मिळाल्याने आढळराव यांची चिंता वाढल्याने आढळराव यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने अजित पवार गटाने शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी जाहीर केली.
दोघांनी आपला प्रचार जाहीर केला असताना मागील पाच वर्षापासून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बांदल यांनी अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढवणारच, असा चंग बांधून त्यांचा मतदारसंघात संपर्क सुरुच ठेवला होता. त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी तयारी केली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या मध्यस्थीने माघार घेऊन राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाची भूमिका बजावत डॉ. अमोल कोल्हेंना निवडून आणले होते.
यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची भेट घेतली होती. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते.
वंचित, बांदलांची व्होट बँक
नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये बांदल यांची शिरुरमधून उमेदवारी जाहीर केल्याने बांदल हे सुद्धा कामाला लागले आहेत. शिरुर लोकसभेत तिरंगी लढत होणार असल्याने कोणाला कोणाच्या उमेदवारीचा आणि कोणाला पक्ष बदलाचा आणि कोणाला पक्षफुटीचा फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मतदार हा सरासरी २० हजारांवर आहे. तर बांदल यांचा मतदारवर्ग हा तितकाच आहे. त्यामुळे बांदल हे किमान ५० हजारांवर मते घेतील, अशी जाणकारांतून चर्चा सुरू आहे.
बांदल काय जादू करणार?
मंगलदास बांदल हे पुणे जिल्ह्यात राजकारणातील जादुगार म्हणून ओळखले जातात. यापूर्वी संख्याबळ नसताना देखील त्यांनी बाजार समिती, जिल्हा परिषद यांसह बँकांच्या निवडणुकीत सत्ता मिळवली आहे, मात्र, त्याचे गुपित अजून कोणालाही उलगडले नाही. यापूर्वी अमोल कोल्हेंना विजयी करण्यात अग्रेसर राहिले. मात्र, आता वंचितकडून उमेदवारी मिळवलेले बांदल काय जादू करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.