नवी दिल्ली – एकीकडे दिल्लीतील लोक पुरामुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे शुक्रवारी एक वेदनादायक घटना समोर आली आहे. मुकुंदपूर परिसरात दिल्ली मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी बांधलेल्या खड्ड्यात आंघोळ करताना तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4.30 वाजता पोलिसांना मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी बांधलेल्या खड्ड्यात तीन मुले बुडाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ मुलांना खड्ड्यातून बाहेर काढले आणि बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही मुले जहांगीरपुरीच्या एच ब्लॉकमधील रहिवासी असल्याचे समजते. पियुष (13), निखिल (10) आणि आशिष (13) अशी या मृतक मुलांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
बाबू जगजीवन राम रुग्णालयातील शवागाराबाहेर मुलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत आक्रोश केला. पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, शुक्रवारी दुपारी मुले आंघोळीसाठी गेली होती. त्यादरम्यान त्यांचा बुडून मृत्यू झाला. खड्डा पावसाच्या पाण्याने भरला होता. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.