पाऊस हुलकावणी देत असल्याने तारांबळ
पुणे – खडकवासला धरणसाखळीने आता तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये अवघा 3.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला केवळ दोन महिने पुरेल इतकाच हा पाणीसाठा आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास लावल्यास शहरावर यंदा पाणी संकट ओढावण्याची शक्यता बळावली आहे. त्यातच हवामान विभाग दररोज पावसाचे अंदाज देत असला, तरी पाऊस मात्र हुलकावणी देत असल्याने यंत्रणाचीही तारांबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात धरणसाठा 1 टीएमसीने कमी झाला आहे. तर, शहरात येणाऱ्या पालखी सोहळ्यासही पाणी पुरवावे लागणार असून, पाऊस आणखी लांबल्यास जून अखेरपर्यंत केवळ अडीच टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.
राज्यासह पुणे जिल्ह्यातही मान्सून लांबला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पूर्व मोसमी पाऊसही अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. तर, जून महिना संपत आला, तरी तापमानाचा पारा अद्यापही 35 च्या वर असून कडक उन्हामुळे बाष्पीभवनही यंदा वाढले आहे. त्यामुळे या वर्षी 18 जूनअखेर खडकवासला धरणसाखळीत अवघा 3.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षी मेमध्ये पूर्वमोसमी आणि त्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्याने जवळपास दुप्पट म्हणजेच 7.06 टीएमसी पाणीसाठा धरणांमध्ये होता. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पाऊस झाल्याने मागील वर्षी धरणेही लवकर भरली होती. मात्र, यंदा कडक उन्हाळा आणि त्यातच आता जूनमध्येच पावसाने ओढ दिल्याने धरणांनी तळ गाठण्यास
महापालिकेला लागते महिन्याला दीड टीएमसी
पावसाने ओढ दिल्यास धरणातील पाणीसाठा पाटबंधारे विभाग आणि महापालिकेस पिण्यासाठी राखून ठेवावा लागणार आहे. महापालिकेकडून शहराला सद्यस्थितीत दिवसाला 1,600 एमएलडी पाणी घेतले जाते. शहरात 24 जुलैपर्यंत पालखी सोहळा असल्याने महापालिकेस सध्या असलेल्या पाण्यात कपात करता येणार नाही. उलट दररोज जादा पाणी उचलावे लागणार आहे. याशिवाय धरणातील पाणी जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठीही द्यावे लागते. त्यामुळे जून अखेरपर्यंत पाऊस न पडल्यास तसेच जुलैमध्येही पावसाची चिन्हे नसल्यास महापालिकेस धरणातील पाण्याचे नियोजन 15 जुलैऐवजी 30 ऑगस्टपर्यंत करावे लागू शकते. त्यामुळे पावसाची अनिश्चितता कायम राहिल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालिकेस पाणीकपातीबाबत निर्णयही घ्यावा लागेल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच खासगीत सांगितले.