Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आता याबाबत राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा हा तिढा सुटल्याचा आनंद असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही असं मोठं विधान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह जरांगे पाटील यांचे देखील आभार मानले.
यावेळी भुजबळांबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले,”मी मंत्री छगन भुजबळ यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कुठल्याहीप्रकारे ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे पुरावा नाहीत अशा लोकांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. ज्या लोकांचा खऱ्या अर्थाने कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं, कार्यपद्धती खूप क्लिष्ट होती त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळू शकत नव्हतं, अशा लोकांना प्रमाणपत्र मिळेल, अशी कर्यपद्धती केली आहे. असं स्पष्टीकरण फडणवीसांनी यावेळी दिल.
सरकार घेणारे नाही तर देणारे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांची वाशीमध्ये जाऊन भेट घेत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर त्यांनी हे सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार असल्याचे म्हटले.राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.