केंदूर (पुणे) – येथील थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरला आहे. बंधारा भरल्याने पाबळ आणि केंदूरच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत जलपूजन केले.
गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या केंदूर आणि पाबळ परिसरात थिटेवाडी बंधारा हा एकमेव शेतकऱ्यांसाठी पाण्याचे स्रोत आहे. हा थिटेवाडी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला तरीही केवळ केंदूरचा काही भाग आणि पाबळच्या काही भागाला याचा फायदा होतो.
दर वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंतच या बंधाऱ्यातला पाणीसाठा शिल्लक राहतो, मात्र पुन्हा पाण्यासाठी दर वर्षी केंदूर, पाबळ, धामारी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या दीड वर्षांपासून बंद पाइपलाइनद्वारे थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी आणण्यासाठी शासन स्थरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र त्या कामालादेखील काहीसा ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, केंदूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय थिटे यांनी बंधाऱ्यातील जलपूजन केले.