नवी दिल्ली- चीनबाबत लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव व त्या अनुषंगाने चीनशी सुरू असलेली चर्चा या विषयाबाबत सरकारने देशातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांना सारी माहिती दिली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
भारत आणि चीन यांच्या संरक्षण मंत्र्यांनी काल रशियाच्या राजधानीत सुमारे दोन तास चर्चा केली. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, या महत्वाच्या विषयाच्या बाबतीत देशातील जनतेला विश्वासात घेणे हा पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांचा राजधर्म आहे.
भारताने चीनशी आत्तापर्यंत अनेक पातळ्यांवर विविध वेळा चर्चा केल्या आहेत पण या चर्चेचे नेमके फलित काय हे लोकांना समजले पाहिजे असे ते म्हणाले. अशा बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमके काय बोलणे होते हे पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे देशातील जनतेला सांगतील काय असा सवालही त्यांनी केला.
भारत-चीन सीमेवर अभुतपुर्व स्थिती निर्माण झाली आहे अशी स्थिती देशाने 1962 पासून आत्तापर्यंत बघितलेली नाही असे विधान भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी केले आहे. त्यांच्या विधानावरून तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.या पार्श्वभूमीवर सरकार चीनशी नेमकी काय चर्चा करते आहे हे लोकांना समजले पाहिजे असे ते म्हणाले.
आपल्या मातृभूमीत अतिक्रमण करणाऱ्या चिनी सैनिकांना तेथून कसे हुसकाऊन लावले जाईल याचे उत्तर लोकांना हवे आहे असे ते म्हणाले. संपुर्ण देश या उत्तराच्या अपेक्षेत आहे असे त्यांनी नमूद केले.