लेखी परीक्षेसाठी मिळणार अतिरिक्त वेळ
दोन पेपरमध्ये दोन दिवसांचे अंतर
प्रश्नसंचही विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार
पुणे – विद्यापीठाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. त्यानंतर त्वरित विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परिपत्रक प्रसिद्ध करीत विद्यापीठाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले. या लेखी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला जाणार आहे.
याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी आज प्रसिद्ध केले. उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत आणि सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने परीक्षा विभागाने पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांची होतील, असे स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा 20 जूनपासून सुरू हाणेणार आहे. नियमित सत्राच्या परीक्षेमधील दोन पेपरमध्ये किमान दोन दिवसांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी प्रत्येक तासामागे 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात येणार आहे. विद्यार्थी ज्या पॅटर्नमध्ये परीक्षा देणार आहेत, त्याच पॅटर्नमधील प्रश्नसंच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. दिवसभरातील सलगच्या दोन पेपरमध्ये एक तासाचे अंतर असेल.
एकसमान परीक्षा पद्धतीवर याचिकाकर्ते ठाम
राज्यातील तीन विद्यापीठाने ऑफलाइन परंतु बहुपर्यायी स्वरुप अर्थात एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. यात एकसमानता यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायायालने राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. मात्र अजूनही सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत एकसमानता दिसत नाही. पुणे विद्यापीठानेही पारंपरिक पद्धतीने परीक्षेचा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या (दि.6) भूमिका जाहीर केले जाईल, असे याचिकाकर्ते कल्पेश यादव सांगितले.